आचरेकर सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार नाही, क्रिकेट रसिकांमध्ये नाराजी
एबीपी माझा वेब टीम | 03 Jan 2019 12:09 PM (IST)
क्रिकेटचे भीष्माचार्य रमाकांत आचरेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा सरकारला विसर पडला असून यामुळे क्रिकेट रसिकांमध्ये नाराजी पहायला मिळत आहे.
मुंबई : क्रिकेटचे भीष्माचार्य रमाकांत आचरेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा सरकारला विसर पडला असून यामुळे क्रिकेट रसिकांमध्ये नाराजी पहायला मिळत आहे. रमाकांत आचरेकर यांचं काल रात्री निधन झालं. ह्रदयविकाराच्या धक्क्याने आचरेकर सरांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी त्यांच्यावर शिवाजी पार्क येथील स्मशानभुमीवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मात्र शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा सरकारला विसर पडल्याचे यावेळी दिसून येत आहे. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याबाबतची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाकडे असते. हा विभाग मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित येतो. रमाकांत आचरेकर यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. मात्र यावेळी केवळ एक प्रतिनिधी सरकारतर्फे उपस्थित होता.