भारत बंद मागे घेतल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. इंधन दर कमी करणं हे सरकारच्या हातात नाही, असं म्हणणाऱ्या केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचाही काँग्रेसने समाचार घेतला. सरकार चालवण्यात मोदी सरकार अपयशी ठरलंय. जे दरवाढ रोखू शकत नाहीत, ते सामान्यांचे प्रश्न कसे सोडवतील, असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला.
“बंददरम्यान हिंसा नाही”
राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष या सर्व पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला. काँग्रेस आणि सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा बंद यशस्वी झाला. आंदोलनादरम्यान कुठेही हिंसा झाली नाही. व्यापाऱ्यांनीही दुकाने बंद करुन बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला, असा दावा अशोक चव्हाण यांनी केली.
“शिवसेनेचा खरा मुखवटा समोर आला”
काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला विविध प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा दिला असला, तरी शिवसेनेने मात्र यामध्ये सहभाग घेतला नव्हता. यावरुन अशोक चव्हाण यांनी शिवसेनेचा आता खरा चेहरा समोर आल्याची टीका केली. शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे, त्यांचा खरा मुखवटा आता स्पष्ट झाल्याचं ते म्हणाले.