मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत उद्या प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचा प्रोमो संजय राऊत यांनी शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये संजय राऊत मुख्यमंत्री ठाकरेंना हे महाविकास आघाडीचं सरकार आपल्याचं ओझ्यानं पडेल, अशी भाकितं अनेक ज्योतिषांनी वर्तवली आहेत? असा प्रश्न करताना दिसत आहेत. यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या शैलीत 'सरकार पडेल असं म्हणणाऱ्यांचे दात पडत आले', असं उत्तर दिलं आहे. सुडानेच वागायचं असेल तर मग तुम्ही एक सूड काढा आम्ही दहा सूड काढतो, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला आहे.


सरकारच्या वर्षपूर्तीवर संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या मुलाखतीची पहिली झलक चांगलीच व्हायरल होत आहे. यात पूर्णपणे, उघडपणे आणि निर्लज्जपणे महाराष्ट्रात हे अघोरी प्रयोग सुरु झाले असं संजय राऊत यांनी विचारलं आहे. यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात की, आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंबं आणि मुलंबाळं आहेत, त्यांना सांगू इच्छितो की तुम्हालाही कुटुंबं आणि मुलंबाळं आहेत. तुम्हीही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ते आम्ही शिजवू शकतो.





या प्रोमोत संजय राऊत मुख्यमंत्री ठाकरेंना महाराष्ट्र आत्मनिर्भर कधी होणार? महाराष्ट्रात कोण कोणाचा सूड घेतोय? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हात धुवा पलिकडे काय सांगणार? असे सवाल करताना दिसत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हात धुवा पलिकडे काय सांगणार? या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणत आहेत की, ठिकय, हात धुतोय, जास्त अंगावर आले तर हात धुवून मागे लागेल. विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करु नका. विकृती ही विकृती असते. जेव्हा आव्हान मिळतं तेव्हा मला अधिक स्फूर्ती येते. कुणी कितीही आडवं आलं तर आडवं येणाऱ्यांना आडवं करुन महाराष्ट्र पुढं जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी या प्रोमोमध्ये दिला आहे.