शिवसेना नरमली, अर्थसंकल्प मांडू देणार!
एबीपी माझा वेब टीम | 18 Mar 2017 12:34 PM (IST)
मुंबई: कर्जमाफीसाठी विरोधकांसह आक्रमक राहिलेली सत्ताधारी शिवसेना काहीशी नरमली आहे. अर्थसंकल्प मांडू देण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून शेतकर्यांची कर्जमुक्ती व्हावी यासाठी शिवसेना आक्रमक होती. आज विधानसभेमध्ये मुख्यमंत्री यांनी निवेदन करताना, शेतकर्यांची कर्जमाफी करताना कर्जाचा हिस्सा राज्य सरकारच्या अंगावर पडेल तो हिस्सा भरण्याची तयारी सरकारची आहे असं सांगितले. यावर आम्ही समाधानी आहोत, असं शिवसेना आमदार विजय औटी यांनी सांगितलं. हा शिवसेनेचा विजय आहे, असंही औटी म्हणाले. आज सभागृहात अर्थसंकल्प मांडणार, त्यावेळी आम्ही सर्व हजर राहून बजेट शांतपणे ऐकणार आहोत, असंही औटींनी सांगितलं. आमचे सर्व आमदार पुढील तीन दिवस या बजेटचा अभ्यास करून त्यावर आपलं मत ठरवतील. आमचा विरोध अजूनही संपलेला नाही परंतु शेतकर्यांसाठी काही मिळाले नाही तर आम्ही पुन्हा आक्रमक होऊ, असा इशारा विजय औटींनी दिला.