BMC Compressed Biogas Project: मुंबईतील कचऱ्याची समस्या मार्गी लागावी, महानगरातील प्रदूषण कमी व्हावे यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महानगर गॅस लिमिटेड यांच्यात कॉम्प्रेस्ड बायोगॅस संयंत्र (Compressed Biogas) स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. कचऱ्यापासून तयार होणारा हा बायोगॅस मुंबईला प्रदूषणापासून मुक्त ठेवणार असा विश्वास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. 


राज्याचे मंत्री दिपक केसरकर म्हणाले, पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी बायोगॅस हा योग्य पर्याय आहे. स्वच्छ आणि सुंदर मुंबईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना मुंबईकरांनीही जोड द्यायला हवी. त्यासाठी प्रत्येकाने ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करायला हवे. गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घ्यावा. तसेच या मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांनाही सामावून घ्या. जणेकरून शाळेतच मुलांमध्ये जनजागृती केली तर हा विषय घरोघरी पोहोचेल.


बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महानगर गॅसने हाती घेतलेल्या या प्रकल्पामुळे लवकरच मुंबईतील हजारो टन कचऱ्याची समस्या मार्गी लागणार आहे. यासोबत मुंबईकरांना पर्यावरणपूरक बायोगॅसही वापरासाठी उपलब्ध होईल, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण मंत्री आणि मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.


बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महानगर गॅस कंपनी दरम्यान बायोगॅस संयंत्र प्रकल्प स्थापन करण्यासाठी आज सामंजस्य करार करण्यात आला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून कचऱ्याचे विलगीकरण आणि पुनर्वापराची प्रक्रिया नियमितपणे करण्यात येते. मुंबईत सन 2050 पर्यंत कार्बन न्यूट्रलचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट इतर शहरांच्या तुलनेत वीस वर्ष आधीचे ठेवण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांचा सहभाग वाढावा म्हणून कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या गृहनिर्माण सहकारी संस्थांना मालमत्ता कराममध्ये 5 टक्के ते 10 टक्के इतकी प्रोत्साहनपर सवलतही देण्यात येणार आहे. 


असा आहे प्रकल्प


मुंबई महानगरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बँक्वेट हॉल येथील वाया गेलेले अन्न आणि मोठ्या भाजी मंडईतील वाया गेलेला भाजीपाला संकलित करण्यात येणार आहे. त्यानंतर या जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी दररोज लागणारा जैविक कचरा बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून खास वाहनातून पुरविला जाणार आहे. कचऱ्याचे संकलन, पृथक्करण आणि वितरण अशी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.


तीन टप्प्यांत सुरू होणार प्रकल्पाचे काम


बायोगॅस प्रकल्प प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तीन टप्प्यांत या प्रकल्पाचे काम सुरू राहणार आहे. त्यात जैविक कचरा प्रक्रिया प्रकल्प, सेंद्रिय खत उत्पादन संयंत्र आणि हरित इंधन उत्पादन संयंत्र या टप्प्यांचा समावेश असेल. या प्रकल्पाद्वारे उत्पादित केलेला जैविक वायू बृहन्मुंबईच्या हद्दीत वापरला जाणार आहे.