मुंबई : गेल्या 8 महिन्यांपासून  मुंबईतील लोअर परेलचा रेल्वे पूल वाहतुकीसाठी बंद  ठेवण्यात आला आहे. धोकादायक असलेल्या या पूलाला तोडून या ठिकाणी नव्याने पुल बांधला जाणार आहे. मात्र, गेल्या एक ते दिड महिन्यापासून या पूलाचं तोडकाम रखडलं आहे.


लोअर परेलच्या या पुलाचं काम बंद रखडल्यानं मुंबईकरांचे अतोनात हाल सुरु आहे. तसेचं पूल बंद असल्याने लोअर परळच्या आजुबाजूच्या परिसरात नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडींला सामोरे जावे लागतं आहे.  लोअर परेल स्थानकातून बाहेर पडण्यासाठी फक्त एक पूल उपलब्ध आहे, पण तो लहान आहे. पूल उतरल्यावर खाली चिंचोळी गल्ली आहे, त्यातच रस्त्यावर बाईक पार्क असतात. तिथून बाहेर पडायला प्रवाशांना 20 ते 25 मिनिट लागत आहेत. पुलाचे काम असेच रखडत राहिले तर मात्र, मुंबईकरांना दीर्घकाळ इथल्या वाहतूक कोंडीला सामोरं जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

तसेच मुंबई महापालिकेचे परवानाधारक दुकानदार आणि फेरीवाले या पुलाच्या आजुबाजूला आणि पुलाच्याखाली व्यवसाय करतात. येथून जवळच असलेल्या मुंबई महापालिकेच्या मार्केटमध्ये त्यांना हलवण्याचा विचार आहे. मात्र, त्यासाठी दुकानदार-फेरीवाल्यांचा विरोध आहे. त्यामुळे रेल्वेने मुंबई महापालिकेला हा प्रश्न सोडवावा असं पत्र लिहिण्यात आलं आहे.

मुंबईतील अंधेरीच्या गोखले पुलाचा स्लॅब कोसळल्यानंतर रेल्व प्रशासन, आयआयटी मुंबई आणि महापालिका अधिकारी यांनी केलेल्या सेफ्टी ऑडिटनंतर लोअर परेल रेल्वे ब्रिज हा धोकादायक असून तो बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेसाठी लोअर परेल रेल्वे ब्रिज (ना. म. जोशी मार्ग) 24 जुलैपासून वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला होता. परंतु तीन दिवसांनी स्थानिक नागरिकांच्या आक्रोशानंतर हा पूल पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आला. दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत ब्रिज बंद राहणार आहे.

संबंधित बातम्या

लोअर परेलचा बंद पूल कोण बांधणार? अखेर तिढा सुटला

लोअर परेल पुलावर शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

लोअर परेल पूल बंद, वळसा घालण्याशिवाय पर्याय नाही!