मुंबई : शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर या दोन पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसतात. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेसोबत 2019 ची निवडणूक लढवल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी बलिदान दिवस समारोह कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी एका पुस्तकातून आम्हाला सांगितलं होतं की युतीत लढलो तर 200 जागा जिंकतील आणि एकटं भाजप लढलं तर 150 जागा जिंकता येतील. त्यावेळी भाऊंचे ऐकलं असतं तर बरं झालं असतं, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत 2019 साली लढल्याबद्दल खंत व्यक्त केली. 


डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिवसानिमित्त ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोशारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित आहेत.  


यावेळी फडणवीस म्हणाले की, भाऊ तोरसेकर यांनी 2013 ला पुस्तकात दावा केला होता की नरेंद्र मोदी हे सत्तेत बहुमताने येतील, त्यावेळी अनेकांनी त्यांना खोटं ठरवलं मात्र हे खरं झालं. भाऊंनी  2019 लोकसभेच्या वेळी सांगितलं होतं की, भाजपला 300 जागा मिळतील, तेव्हा भाजपला 302 जागा मिळाल्या. आणखी एक भाकीत तोरसेकर यांनी केलं होतं ज्याकडे मी दुर्लक्ष केलं. तोरसेकर म्हणाले होते महाराष्ट्रात भाजप हे युतीत लढली तर एकत्रित 200 जागा आणि स्वतंत्र लढली तर 150 जागा येतील.त्यावेळी भाऊंचे ऐकलं असतं तर बरं झालं असतं असं फडणवीसांनी म्हटलं. राजकारणात असं होतं असतं, असंही ते म्हणाले. 


शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजप आणि शिवसेनेची युती व्हावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली होती. त्यानंतर राज्यात पुन्हा युती होणार का? अशा चर्चा रंगल्या. पण ही चर्चा सुरू असतानाच 2019 आली शिवसेनेसोबत युती केली नसती तर बरं झालं असतं, जाहीरपणे बोलून दाखवला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपची जवळीक वाढणार का? असा प्रश्न पडतोय .


राज्य सरकारमध्ये कुरघोडीचं राजकारण


फडणवीस यांनी अधिवेशनासंदर्भात राज्यपालांची भेट घेतल्यानंतर म्हटलं की, राज्य सरकारमध्ये कुरघोडीचं राजकारण आहे. प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाचा आणि आपल्या नेत्यांचा विचार करतोय. जनतेचा विचार कुणीच करत नाही. म्हणून मी सांगतोय की अंतर्विरोधाने भरलेलं सरकार फार काळ चालत नसतं. आज फक्त सत्तेच्या गुळाला चिकटलेले मुंगळे अशी अवस्था महाराष्ट्रात दिसते आहे. पण हा सत्तेचा गूळ किती दिवस पुरेल? हे मला माहिती नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्ष आहोत. आम्ही जनतेच्या आशा, अपेक्षा मांडतच राहू, असं फडणवीस म्हणाले.