मुंबई : अनेकदा नागरिकांना क्लिन अप मार्शलकडून (Clean up Marshal) त्रास दिला जातो. तर मार्शललाही मारहाण होत असून, या घटना गंभीर असल्याचे वक्तव्य महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केले. क्लिन अप मार्शल आणि नागरिकांमधील वाद रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. ऑनलाईन मार्शल प्रकियेबाबत लवकरच निर्णय घेऊ असेही पेडणेकर म्हणाल्या.


कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबईत नागरिकांनी नियम तोडू नये, यासाठी पालिकेने  क्लीनअप मार्शल्सची नियुक्ती केली आहे. या क्लीनअप मार्शल्सकडून चुकीच्या पद्धतीने मुंबईकरांकडून पैसा उकळला जात असल्याचे आरोप केले जात आहेत. तसेच अनेकदा नागरिक आणि त्यांच्यात वादही होताना दिसतायेत. त्यामुळे या प्रकरणाची मुंबई महापालिकेने दखल घेतली आहे.


गेल्या दोन ते तीन दिवसापासून केंद्र सरकारकडून येणाऱ्या सुचना आम्ही ऐकत आहोत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे  चिंता व्यक्त करत आहेत. ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील जिवाची परवा न करता तासंतास तज्ञ डाँक्टरांशी याबाबत चर्चा करत असल्याचे महापौर पेडणेकर म्हणाल्या. नागिकांनीसुद्धा नियमांचे पालन करुन सहकार्य करणे तितकेच महत्वाचे आहे. लवकरच लहान मुलांच्या लसीकरणाबाबतही निर्णय घेऊ. लसी उपलब्ध आहेत. तज्ञांसोबत बैठकीत याबाबत चर्चाही झाल्याचे त्यांनी सांगितले. 


संसर्ग रोखण्यासाठी कलम 144 लागू
वाढता कोरोना आणि ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता आज रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्यामुळे रात्री ९ ते सकाळी 6 या वेळेत पाच जणांच्या वर नागरिकांनी एकत्र येता कामा नये असे त्या म्हणाल्या. नारिकांनी घाबरण्याची गरज नाही. पालिक आणि प्रशासन आपली कामे करतीलच मात्र नागरिकांनीही स्वत:ची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले. मार्केटमध्ये जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. नागिकांकडूनच या तक्रारी येत आहेत. मग दंड आकारायला गेल्यावर वाद होत आहेत. नियम पाळले तर मार्शलची गरज भासणार नाही असेही त्या यावेळी म्हणाल्या. कार्यक्रम, सभा यांच्यावरही निर्बंध लावण्यात आले असल्याचे त्या म्हणाल्या.


कार्यक्रमांना विरोध नाही, मात्र नियम पाळणे गरजेचे
अनेकांनी 31 डिसेंबरसाठी  हॉटेल बुकिंग केली आहेत. त्याबाबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ.
आमचा कार्यक्रमांना विरोध नाही, मात्र नियमावली पाळनं गरजेचं आहे, अन्यथा कारवाई होणारच असा इशाही महापौर पेडणेकर यांनी दिला आहे. ज्यांनी हॉटेल बुकिंग केली आहेत, त्यांना रीफन्ड मिळण्यासंदर्भात निर्णय घेतला नाही. मात्र रिफंड मिळण्याची शक्यता नाही. कारण पूर्ण बंदी आणली नाही. फक्त जे नियम आहेत त्याचे पालन करणं गरजेचे आहे.