मुंबई : केंद्र सरकारने 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावी पर्यंत शाळा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे राज्यात शाळा सुरु करणे एवढ्यात तरी शक्य नसल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने याबाबत गाईडलाईन्सही जारी केल्या आहेत. मात्र शिक्षण विभागाने राज्यातील संस्था चालक तसेच शिक्षण तज्ज्ञ यांच्या समवेत चर्चा केली आणि त्यांची मतं जाणून घेतली. त्यात बहुतेक शिक्षक, संस्थाचालक यांनी शहरी भागासह ग्रामीण भागातही आता कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे शाळा तुर्तास सुरू करण्यास हरकत घेतली आहे, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.


राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा केली जाणार आहे. तुर्तास इयत्ता दहावी आणि नववी तुकड्या सुरू करण्याचा विचार नाही, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. शहरी भागात आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत असल्याने सप्टेंबर अखेर शाळा सुरू करण्याबाबत बहुतेक प्रतिकूल मत आहे, असंही गायकवाड यांनी सांगितले.


विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडित हा प्रश्न आहे आणि विद्यार्थ्यांचं शिक्षणही सुरु राहणे गरजे आहे. शाळा सुरु केल्यास विद्यार्थ्यांना शाळेत बोलवणे धोक्याचं आहे. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्यासाठी यावर सखोल चर्चा होणे गरजेचं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा करुन याबाबत निर्णय घेतला जाईल, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं.


येत्या 21 सप्टेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू होणार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी


येत्या 21 सप्टेंबरपासून इयत्ता 9 ते 12 वी वर्गसाठी शाळा सुरू करण्यास केंद्राकडून परवानगी मिळाली असून त्यासाठी काटेकोर पणे गाईडलाईन्सचे पालन करणे सुद्धा गरजेचं आहे. पालकांच्या संमतीनेचा विद्यार्थी शाळेत येतील. शिवाय शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळा सुरू करण्यास परवानगी असेल. एखादा विद्यार्थी किंवा शिक्षक आजारी असल्यास त्याने शाळेत येऊ नये. शाळेत एक वेगळा आयसोलेशन रुमही बनवला गेला पाहिजे. जेणेकरुन जर कोणी आजारी असेल तर तो आरोग्य सुविधा येईपर्यंत त्या खोलीत राहू शकेल. जर एखादा विद्यार्थी आजारी पडला तर त्याला पालकांसह स्थानिक आरोग्य यंत्रणेस माहिती द्यावी लागेल.