मुंबई : मुंबई विद्यापीठातून कोकणाला वेगळं करण्याची मागणी कोकण विद्यापीठ कृती समितीने केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन पेपर तपासणीच्या गोंधळानंतर विद्यापीठाची पुरती बेअब्रू झाल्याने ही मागणी जोर धरत आहे.


निकाल घोळ प्रकरणाचा नाहक त्रास कोकणातील विद्यार्थ्यांना सहन करावा लागला. कुठल्याही अडचणीसाठी कोकणातील विद्यार्थ्यांना 400 ते 500 किमी प्रवास करुन मुंबईला यावं लागतं.

त्यावर कोकणासाठी उपविभाग केला असला तरी को-ऑर्डिनेटर नेमलेला नसतो. त्यामुळे रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड जिल्ह्यातील एकूण 103 महाविद्यालयांसाठी स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी कोकणातील प्राचार्य आणि प्राध्यापकांनी केली आहे.

याबाबत कोकण विद्यापीठ कृती समितीचं शिष्ठमंडळ मुख्यमंत्र्यांनाही लवकरच एक निवेदन देणार असल्याचं कृती समितीच्या अध्यक्ष विलास पाटणे यांनी सांगितलं.