ठाणे : ठाण्यातील शिवसेना उपविभागप्रमुखावर भरदिवसा चाकू हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. सुदैवाने या हल्ल्यात किशोर आहिरे यांना कसलीही दुखापत न झाल्याने ते थोडक्यात बचावले.


हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. किशोर आहिरे हे शास्त्रीनगरचे उपविभागप्रमुख आहेत. त्यांच्या इमारतीखाली आलेल्या तिघांनी त्यांना खाली बोलावले. त्यांच्यात कोणत्या तरी कारणावरुन वाद सुरु असताना त्यातील एकाने किशोर अहिरे यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. दरम्यान हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

एका पुनर्वसन प्रकल्पात खोटे लोक लाभार्थी झालेले असल्याने आणि याबाबत तक्रार केल्यानेच हा हल्ला झाला असल्याचे अहिरे यांनी सांगितलं. याबाबत वर्तकनगर पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेला असला तरी पोलीस आरोपींना राजकीय वरदहस्तामुळे अटक करत नसल्याचा आरोप अहिरे यांनी केला आहे.