मुंबई : रेल्वे प्रश्नावर पाठपुरावा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या भाजपच्या समितीतून खासदार किरीट सोमय्यांना वगळण्यात आलं आहे. गरबा प्रकरणावरुन भाजप कार्यकरिणीने सोमय्यांना वगळल्याची चर्चा आहे.


एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे प्रश्नावर पाठपुरावा करण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत आशिष शेलारांसह मधू चव्हाण, भाई गिरकर, प्रभाकर शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे.

ही समिती रेल्वे प्रशासन, महापालिका, केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये समनव्य साधण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. पण या समितीतून रेल्वे प्रश्नावरुन सतत पुढे पुढे करणाऱ्या किरीट सोमय्या यांना यातून वगळण्यात आलं आहे.

सोमय्या यांना यातून वगळण्याचा निर्णय प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर किरीट सोमय्या यांचा गरबा खेळताना व्हिडिओ वायरल झाल्यानं भाजपकडूनही सावध भूमिका घेतल्यांचं बोललं जात आहे.