मुंबई : बीएमसीकडून कंगनाच्या कार्यालयाचं अनधिकृत बांधकाम तोडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. कंगनाने पुन्हा मुख्यमंत्री यांचा एकेरी उल्लेख केला आहे. या ट्वीटमध्ये तिने बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मात्र आदर व्यक्त केला आहे.  ज्या विचारधारेवर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा पाया रचला, तिच विचारधारा विकून शिवसेना सत्तेसाठी सोनिया सेना बनली आहे. ज्या गुंडांनी माझ्या नकळत माझं घर तोडलं, त्यांना स्थानिक प्रशासकीय संस्था म्हणू नका. संविधानाचा इतका अपमान करू नका,” असं कंगनानं म्हटलं आहे.



वडिलांच्या चांगल्या कर्मामुळं तुम्हाला धनदौलत तर मिळू शकते मात्र आदर तुम्हाला स्वत: कमवावा लागतो. माझं तोंड बंद कराल मात्र माझ्यानंतर शंभर जण तो आवाज लाखों लोकांपर्यंत पोहोचवतील. किती तोंडं तुम्ही बंद करणार? कुठवर सत्यापासून दूर पळणार. तुम्ही फक्त वंशवादाचं एक उदाहरण आहात, बाकी काही नाही, असं कंगनानं एकेरी भाषा वापरत ट्वीटमध्ये म्हटलंय.





आज मेरा घर टुटा, कल तेरा घमंड टुटेगा; मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत कंगनाची टीका


आज मेरा घर टुटा, कल तेरा घमंड टुटेगा


मुखमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत काल देखील कंगनानं टीका केली होती.  "आज मेरा घर टुटा, कल तेरा घमंड टुटेगा" असं कंगनाने म्हटलं होतं. कंगनाने एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, "उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटते फिल्म माफियांसोबत मिळून तुम्ही माझे घर पाडून मोठ बदला घेतला आहे. आज माझे घर तुटले आहे, उद्या तुझा अहंकार तुटेल. हे काळाचे चक्र आहे, लक्षात ठेवा हे नेहमीच सारखं नसतं. मला वाटतं तुम्ही माझ्यावर खूप उपकार केले आहेत. कारण काश्मिरी पंडितांसोबत काय घडलं हे मला आज कळलं. आज मी देशातील जनतेला वचन देतो की मी केवळ अयोध्येवरच नाही तर काश्मीरवरही एक चित्रपट बनवणार आहे. आणि माझ्या देशवासियांना जागे करणार आहे. कारण जे माझ्याबाबतीत घडलं ते कुणासोबतही घडेल. उद्धव ठाकरे ही क्रुरता आणि दहशत माझ्यासोबत घडली हे चांगलं झालं. जय हिंद जय महाराष्ट्र, असं तिनं म्हटलं होतं.



खारच्या फ्लॅटवरुन कंगनाचं शरद पवारांकडे बोट, जितेंद्र आव्हाडांचं कंगनाला उत्तर


कंगनाच्या खार परिसरात असलेल्या फ्लॅटवरुन कंगना रनौतनं आता शरद पवारांकडे बोट दाखवलं आहे. यासंदर्भात तिनं ट्वीट केलं असून त्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कंगनाला तिचं नाव न घेता उत्तर दिलं आहे. फ्लॅटचं अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने कंगना रनौतला नोटीस बजावली होती. या नोटिसमध्ये असं म्हटलं होतं, फ्लॅटमध्ये चुकीच्या पद्धतीने बदल करण्यात आले आहेत. यामध्ये नियमांचे उल्लंघन केले गेलं आहे. कंगनानं ट्वीट करत म्हटलं आहे की, महाराष्ट्र सरकारचे पेड सोर्स चुकीची माहिती पसरवत आहेत. बीएमसीने कालपर्यंत मला कधीही नोटीस पाठविली नाही. खरं तर सर्व कागदपत्रांच्या नूतनीकरणासाठी मी स्वत: सर्व कागदपत्रं बीएमसीला दिली होती. बीएमसीसमोर किमान आपल्या धैर्याने उभे राहण्याची ताकत माझ्यात आहे. आता खोटं का बोलत आहेत? असा सवाल कंगनानं ट्वीटमधून केला आहे.




हा फक्त माझाच नाही तर संपूर्ण इमारतीचा प्रश्न होता, केवळ माझ्या फ्लॅटचा इश्यू नाही. ज्यासाठी बांधकाम व्यावसायिकाने सामोरे जाण्याची गरज आहे. ही इमारत शरद पवारांची आहे. आम्ही हा फ्लॅट त्यांच्या पार्टनरकडून खरेदी केला आहे. म्हणूनच ते यासाठी उत्तरदायी आहेत, असं तिनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


यावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कंगनाचं नाव न घेता टीका केली आहे. आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, शरद पवार यांनी महाराष्ट्र उभा केला, बांधला. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये. पण जिला महाराष्ट्राबाबत काहीच माहीत नाही ती म्हणते त्यांनी बिल्डिंग बांधली, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.