कल्याण : नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे नऊ डबे घसरुन अपघात झाला आहे. कल्याणमध्ये आसनगाव आणि वासिंद रेल्वे स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली. अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे.


नागपूरहून मुंबईला येणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसच्या इंजिनसह नऊ डबे घसरले. आसनगाव-वासिंद रेल्वे स्थानकांदरम्यान सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात घडला. एक्स्प्रेसचं इंजिन रुळावरुन घसरुन उलट पडलं, तर एक्स्प्रेसचे डबे वीस फूट अंतरावरील टेकडीवर जाऊन आदळले.



आसनगाव आणि वासिंद स्थानकांच्या दरम्यान खूप पाऊस झाल्यामुळे अचानक दरड कोसळली. त्यामुळे रेल्वे
रुळाखालील खडी वाहून गेली. ही बाब लोको पायलटच्या लक्षात येताच त्याने आपत्कालीन ब्रेक लावले. त्यामुळे मोठा अपघात टळला.

इंजिनशिवाय SLR, H1, A1, A2, A3, B1, B2, B3, B4 हे डबे घसरले आहेत. अपघाताच्या वेळी ट्रेनचा वेग कमी होता. तसंच डबे रुळावरुन घसरल्यानंतर काही प्रवासी बर्थवरुन पडून किरकोळ जखमी झाल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

https://twitter.com/ANI/status/902356033665826817

लोकल विस्कळीत

नऊ डबे घसरल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी एक दिवस लागण्याची शक्यता आहे. अपघातात रेल्वे लाईन संपूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कल्याण आणि कसारा दरम्यान लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे.

नागपूरहून मुंबईला येणाऱ्या ट्रेन रखडल्या

विदर्भ एक्स्प्रेस
अमरावती एक्स्प्रेस
सेवाग्राम एक्स्प्रेस

गाड्यांची स्थिती

फिरोजपूर-सीएसएमटी पंजाब मेल इगतपुरीजवळ थांबली
मनमाड-सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस इगतपुरीजवळ थांबली
मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्स्प्रेस इगतपुरीजवळ रखडली
मनमाड-एलटीटी एक्स्प्रेस आज रद्द

स्टेशन्सवर खोळंबलेल्या रेल्वे गाड्या

सेवाग्राम, जनशताब्दी एक्स्प्रेस मनमाडला उभी
गरीबरथ लासलगावला उभी
जनता एक्स्प्रेस अस्वली स्टेशनला उभी
पंचवटी एक्स्प्रेस घोटीला तर पंजाब मेल इगतपुरीत थांबून

हेल्पलाईन

सीएसटीएम 022-22694040,

ठाणे 022-25334840,

कल्याण 0251- 2311499,

दादर 022-24114836,

नागपूर 0712-2564342

रेल्वे प्रशासन घटनास्थळी गेल्यावर घसरलेले रेल्वेचे डबे हटवण्याचं काम सुरु करेल, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारीचे ए. के. जैन यांनी दिली आहे. दुरांतो एक्स्प्रेस घसरल्याच्या तासाभरानंतरही रेल्वे प्रशासनातर्फे कोणीही घटनास्थळी पोहचलं नसल्याचा दावा प्रवाशांनी केला आहे.

अडकलेल्या प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी कल्याणवरुन बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे किरकोळ जखमा झालेल्या प्रवाशांवर उपचारांसाठी डॉक्टरांची टीम रवाना झाली आहे.