मुंबई : परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर अखेरीस महाविकास आघडी आक्रमक झाली आहे. फोन टॅपिंग प्रकरणावरुन राज्यात खळबळजनक माहिती समोर येण्याचं सत्र सुरु आहे. काल कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आज पुन्हा ट्वीट करत शुक्लांवर आरोप केले आहेत. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा माध्यामांशी संवाद साधताना याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 


जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "मी स्वतः राजेंद्र येड्रावरकरांशी बोललो. त्यांनी मला सगळी परिस्थिती सांगितली. त्यांच्या मागे पोलीस ऑफीसर लावण्यात आला होता. रश्मी शुक्ला यांनी 'मेरे साथ चाय पिओगे, तो नमक हरामी नही होगी' असं त्यांना म्हटलं होतं." रश्मी शुक्ला यांच्यासंदर्भात बोलताना आव्हाड म्हणाले की, "या सरकारला दिलदार राहणं महागात पडलं. रश्मी शुक्ला यांनी रडून माझ्या पतीचं आताच निधन झालय असं म्हणून माफी मागितली होती. मग आमच्या सरकारला पाझर फुटला. रश्मी शुक्ला यांनी पाया पडत माफी मागितली आणि त्यांनी दिलेलं लेखी पत्र परत मागितलं. बरं झालं सरकारने ते पत्र परत नाही दिलं. आता कळतंय हा कटाचा भाग होता. रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट म्हणून काम करत होत्या" तसेच विरोधकांकडून सातत्यानं केल्या जाणाऱ्या मागणीसंदर्भात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "आम्ही शपथ घेतल्यानंतर 36व्या तासांनंतर राष्ट्रपती राजवट लागू होणार असं बोललं जाऊ लागलं. त्यात काही नवं नाही." 


म्हाडाचे 100 फ्लॅट्स कॅन्सरग्रस्तांना राहण्यासाठी देणार; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती


म्हाडाचे 100 फ्लॅट्स कॅन्सरग्रस्तांच्या सोयीसाठी टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडे सोपवले जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज(गुरूवार) पत्रकापरिषदेत बोलताना दिली. यावेळी त्यांच्यासोबत मुंबईतील टाटा हॉस्पिटलचे अधिकारी देखील उपस्थित होते. 


गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड बोलताना म्हणाले की, "सर्वांनाच माहिती आहे आणि असं अनेकदा दिसून येतं की, बरेच रूग्ण किंवा रूग्णांच्या नातेवाईकांना मुंबईतील रस्त्यांवर राहावं लागतं. हे दृश्य पाहून अत्यंत वाईट वाटतं. म्हणून आम्ही मानवतेच्यादृष्टीने असा विचार केला की, आमच्याकडे जेवढे काही फ्लॅट्स आहेत, ते आम्ही आज 100 आणि आगामी काळात ते वाढवून 200 करणार आहोत. ते फ्लॅट्स आम्ही टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडे सोपवणार आहोत. त्यानंतर त्या फ्लॅट्सशी म्हाडाचा काहीच संबंध राहणार नाही. याचं कारण हे आहे की, यामध्ये राजकीय हस्तक्षेप येईल. आम्हाला तो नकोय, ज्यांना खरचं गरज आहे, त्यांनाच त्याचा लाभ मिळायला हवा. यासाठी आम्ही हे फ्लॅट्स टाटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया केवळ सात दिवसांमध्ये झाली. याचा मला अभिमान आहे. टाटा आणि म्हाडामध्ये तसा करार देखील झालेला आहे. करीरोड स्टेशनच्या बाजूला आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटलपासून पाच मिनिटांच्या अंतरावर हे फ्लॅट्स आहेत."


महत्त्वाच्या इतर बातम्या :