Jitendra Awhad : आर्यन खानची काल झालेली मुक्तता हे इथल्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरो हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. एखाद्या बालमनावर चार महिने जेलमध्ये जाऊन आल्यावर काय परिणाम होतो हे आपल्या घरच्या मुलाकडे बघून आपण विचार केला पाहिजे. ठप्पा मारून त्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न हा अमानवी आहे. या माणसांमध्ये मानवता धर्मच नाही. त्यामुळे 'उपरवाला सब देखता है', अशी प्रतिक्रिया मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी डोंबिवलीत दिली. आर्यन खानची (Aryan Khan) निर्दोष मुक्तता झाल्यानंतर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. याबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया  दिली.


छत्रपती शाहू महाराज बोलले यातच सगळं आलं - जितेंद्र आव्हाड


संभाजीराजे छत्रपती  यांनी शिवसेनेवर केलेल्या आरोपानंतर शाहू महाराजांनी संभाजीराजेंना खडे बोल सुनावले. संभाजीराजे छत्रपती यांनी मात्र याबाबत प्रतिक्रिया देत नाही असे ट्वीट केले. याबाबत प्रतिक्रिया देताना मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शाहू महाराज बोलले यातच सगळं आलं अशी प्रतिक्रिया दिली. आव्हाड म्हणाले की, मोदींनी कोणतेही असं काम केलं नाही की देशाची मान शरमेने खाली जाईल. किंबहुना कोणत्याही पंतप्रधानाने केली नाही. सत्तर वर्षाच्या इतिहासात देशाची मान कायम ताठ राहील असंच काम प्रत्येक पंतप्रधानाने केलं त्याचा आम्हाला अभिमान आहे असे सांगितले.
 
27 गावांना पाणी देण्याची जबाबदारी सरकारला घ्यावी लागेल - जितेंद्र आव्हाड


27 गावात भेडसावणाऱ्या पाणी समस्या बाबत बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की, या गावांना भेडसावणाऱ्या पाणी समस्या बाबत लवकरच जलसंपदा जलसंपदामंत्री सोबत बैठक लावली जाणार आहे. या 27 गावांना पाणी देण्याची जबबदारी सरकारला घ्यावी लागेल महानगरपालिकेला त्यासाठी आर्थिक मदत करावी लागेल, ते करण्याचं काम आम्ही करू. या गावांसाठी जास्तीत जास्त पाणी जलसंपदामंत्र्यांकडून एमआयडीसीला देवून एमआयडीसीकडून यांना पाणी पुरवठा करण्याची मागणी जलसंपदा मंत्र्यांकडे करणार असल्याचे मंत्री आव्हाड यांनी सांगितले.