मुंबई : राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या जसजशी वाढतेय तसतसं राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यास राज्य सरकार कमी पडल्याचा आरोप आता विरोधक करत आहेत. परप्रांतीय मजुरांच्या रेल्वे भाड्यासाठी केंद्र 85 टक्के अनुदान देत असल्याचाही दावा भाजपकडून करण्यात आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यपालाकंडे चकरा वाढल्या आहेत. आता तर केंद्रातीन नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. या सर्व पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी पत्रकार परीषद घेत. विरोधी पक्षांच्या प्रश्नाची सडेतोड उत्तरे दिली. यावेळी त्यांनी भापजने केलेले अनेक दावे आणि आरोप फेटाळून लावले.


केंद्राचा दावा आम्ही 85% सबसिडी देतो. या आकड्यांनुसार सध्या तिकीट दर जास्त आहे. केंद्राच्या दाव्यात आणि तिकीट दरात फरक आहे. आमच्या मित्रांनी यावर बोलावे, श्रेय हवं असेल तर ती व्यवस्था चालू आहे का? हे पाहावे, असा टोला त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला. केंद्र सरकार रेल्वे तिकीटाचे 85 टक्के खर्च करत आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्याला आकडेवारी देत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले.


मुंबईत पुढच्या 90 दिवसांसाठी सर्व खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड महापालिकेने हातात घेतले आहे. अशा रुग्णालयांमध्ये रुग्ण पाठवण्याबाबत महापालिका केंद्रीय पद्धत राबवणार असल्याची माहिती पाटली यांनी दिली. उर्वरीत 20 टक्के बेड हे त्या रुग्णालयाकडे राहणार आहेत. गेले तीनचार दिवस मुंबईतील रुग्णांसाठी महापालिकेने एक डॅश बोर्ड तयार केला आहे. त्याच्या ट्रायल झाल्या आहेत. त्यानुसार लवकरच काम सुरू होणार आहे. कोणत्या रुग्णालयात किती बेड, किती ICU बेड किती हे आता 1916 ला फोन केल्यावर कंट्रोल रुममधून कळणार आहे. तिथे 10 डॉक्टर असणार आहेत. रुग्ण आला की तो कुठे जाणार, बेड कुठे उपलब्ध आहे? याची सर्व माहिती फोनवर मिळणार आहे. 10 ते 15 मिनिटांमध्ये रुग्णालयात व्यवस्था मिळेल.


रेल्वे मंत्रालय महाराष्ट्रावर अन्याय करतंय; सत्यजित तांबे यांचा आरोप


कोरोनाचा संसर्ग वाढला तर 40 हजार पर्यंत रुग्णसंख्या जाण्याची भीती जयंत पाटील यांनी व्यक्त केली. डायलेलीस रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यासाठी डायलेलीस बेड पूल केले आहे. ही सुविधा त्यांना कमी खर्चात उपलब्ध होणार आहे. मुंबई आयुक्त चांगलं काम करत आहेत. त्याच्या कामावर शंका घेण्यापेक्षा पाठिंबा देणे अपेक्षित असल्याचा टोला पाटील यांनी विरोधकांना लावला. आतापर्यंत 320 रेल्वेने लोक बाहेर गेले आहेत. यात 4 लाख 26 हजार मजुर बाहेर गेल्याची माहिती जयंत पाटील यांनी केली आहे. यातील 187 रेल्वे उत्तर प्रदेशमध्ये गेली आहे. या आठवड्यात 200 रेल्वे गाड्यांचं नियोजन आहे. यातून 3 लाख लोक आपापल्या राज्यात जातील. आज 65 ट्रेन जाणार आहे. एका रेल्वेला 9-10 लाख खर्च येतो. आतापर्यंत 75 कोटी मुख्यमंत्री सहायता निधी मधून दिले आहेत. यावरुन केंद्राशी वाद घालयचा नाही. भाजपने केलेल्या दाव्याची पोलखोल जयंत पाटील यांनी केली.

रस्त्यावर चालत जाणाऱ्या परराज्यातील मजुरांना 13 हजार 655 बसेस पाठवल्या. खासगी गाड्यांनी 2 लाख वाहनांनी 8 लाख लोक बाहेर गेले. पश्चिम रेल्वे आम्ही मागत आहोत. पश्चिम रेल्वे आज 55 गाड्या सोडणार आहे. तर, 37 गाड्या गुजरात मधून सुटणार आहेत. यातील महाराष्ट्राला फक्त 18 गाड्या दिल्या आहेत. गरज असताना आपल्याला कमी ट्रेन मिळाल्या आहेत. काही लोक चित्र तयार करत आहेत. महाराष्ट्र काही करत नाही म्हणून आकडेवारी दिली.


घराच्या अंगणाला 'रणांगण' बनवणं याला शहाणपण म्हणत नाहीत : उपमुख्यमंत्री अजित पवार 


केंद्राने 20 लाख कोटीचे पॅकेज दिले आहे. या 20 लाख कोटीपैकी 2 लाख कोटी इतकी रक्कम बजेट मधून जात येत आहे. ही जीडीपीच्या एक टक्के रक्कम येत आहे. आमच्याकडून पॅकेज मागितलं म्हणून खुलासा करत आहोत. राज्य सरकारचे केंद्राकडून येणारे पैसे आले तरी आभार मानू, अशा टोलाही त्यांनी यावेळी विरोध पक्षाला लगावला. आज पैशाची भ्रांत आहे. मुंबई, पुणे शहर ठप्प आहेत. केंद्र सरकारकडून 4050 कोटी राज्याला देतात. त्यातले हक्काचे पैसे आले नाही. केंद्राने वेळेवर पैसे दिले पाहिजे. जीएसटी कॉम्पेनसेशन 5100 कोटी केंद्राने अजून दिले नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितले.


पवार साहेबानी काय करावं आणि काय करू नये याबाबत आमच्या मित्रांनी सल्ले देऊ नये, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यपाल भेटीवरही जयंत पाटील यांनी सडकून टीका केली. हा काळ सर्वांनी एकत्रित येऊन लढायचा आहे. यात राजकारण आणू नये, असे आवाहन पाटील यांनी केले. काही लोक राजकारण करत आहे. तर, काही लोक अस्वस्थ असल्याचे त्यांनी म्हटले. दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना विनंती आहे. आमच्याशी बोला, आम्हाला सुचवा, सतत राज्यपालांना जाऊन त्रास देऊ नका. व्यवस्थेचे मनोबल खच्चीकरण करणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. इथून पुढे फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून सल्ला द्यावा, असं आवाहन पाटील यांनी केलं.


महाराष्ट्र बचाओ ही आंदोलन करण्याची भूमिका आहे. त्यांना राज्य सरकारच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत आहोत. कोविड बाबत मुख्यमंत्र्यांच्या मागे उभे राहावे. हे भान सगळ्यांनी पाळवे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत काय प्लॅन आहे, हे सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या ट्विटमधून कळेल. आम्ही काम करत आहोत, असं शेवटी जयंत पाटील यांनी म्हटले आहे.


Jayant patil On Corona update | मुंबईत कोरोनाचे रुग्ण 40 हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता : जयंत पाटील