हायकोर्टाचा 'त्या' सहा नगरसेवकांसह शिवसेनेला तूर्तास दिलासा
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 11 Apr 2018 08:11 PM (IST)
यासंदर्भात हायकोर्टात प्रलंबित असलेल्या याचिकेवर ऑगस्ट 2018 मध्ये सुनावणी होणार आहे. ही सुनावणी लवकर घेण्यासाठी मनसेने बुधवारी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली होती.
मुंबई : मनसेला जय महाराष्ट्र करून शिवसेनेत दाखल झालेल्या 'त्या' सहा नगरसेवकांना आणि शिवसेनेला हायकोर्टाचा तूर्तास दिलासा मिळाला. यासंदर्भात हायकोर्टात प्रलंबित असलेल्या याचिकेवर ऑगस्ट 2018 मध्ये सुनावणी होणार आहे. ही सुनावणी लवकर घेण्यासाठी मनसेने बुधवारी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र यावर तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टाने नकार दिला. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. ऑगस्टमध्ये होणारी ही सुनावणी लवकर जूनमध्ये घेऊ, असं सांगत हायकोर्टाने यावर कोणतेही निर्देश देण्यास नकार दिला. कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेला निर्णय बेदायदेशीर असल्याचा दावा करत मनसेने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. शिवसेनेत दाखल होण्याच्या या प्रक्रियेला कोकण विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली होती. मनसेचे सरचिटणीस शिरीष सावंत यांनी ही याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. दिलीप लांडे, हर्षला मोरे, दत्ता नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्नर कदम, अश्विनी माटेकर या सहा नगरसेवकांनी मनसेला सोडून शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांसह शिवसेना गटनेते यशवंत जाधव आणि कोकण विभागीय आयुक्तांनाही या याचिकेत प्रतिवादी करण्यात आलं आहे. गेल्यावर्षी पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला 84 तर भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला चार अपक्षांचा पाठिंबा असून भाजपला एक अपक्ष आणि अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांचा पाठिंबा आहे. पुढे भांडुप पोटनिवडणुकीतील विजयाने भाजपचं संख्याबळ एकने वाढलं, भाजप डोईजड होऊ शकेल त्यामुळे शेवटी मनसेचे सहा नगरसेवक आपल्या बाजूला वळवले. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ तब्बल 94 वर पोहोचलं आहे. संबंधित बातम्या :