मुंबई: येत्या 24 तासात मुंबई आणि कोकणात जोरदार पाऊस होईल, अशा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. काल रात्री दक्षिण मुंबईसह, पूर्व उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली.


 

अंधेरी, पवई, जोगेश्वरी मध्ये जोरदार पाऊस झाल्यानं ठिकठिकाणी पाणी साचल्याचं मुंबईकरांची चांगलीच कसरत झाली. त्यामुळं पालिकेच्या दावा पुन्हा खोटा ठरला आहे. दादरमध्ये पावसामुळं झाडं मुळासकट उखडून एका गाडीवर कोसळलं. ठाणे आणि नवी मुंबईतही संततधार सुरुच होती. दरम्यान सध्या पाऊस थांबला असून वाहतुकीवर काहीही परिणाम नाही.

 

शुक्रवारी सकाळी 8 ते आज पहाटे वाजेपर्यंत मुंबई शहरात 73 मिमी, पश्चिम उपनगरात 74.43 मिमी, तर पूर्व उपनगरात 107.79 मिमी पावसाची नोंद झाली. मान्सूननं मुंबईत उशिरा एन्ट्री केली असली तरी आता त्यानं चांगलाच जोर धरला आहे.

 

काल दुपारी मुंबईत पाऊस बरसताच पावसाचा आनंद लुटण्यासाठी तरूणांनी मरिन ड्राइव्ह, वरळी सी फेस आणि गेटवे कडे धाव घेतल्याचं पाहायला मिळालं. तरुणांनी या पावसाचा चांगलाच आनंद लुटला.

 

समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा आणि पावसाच्या सरी झेलण्यासाठी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर चांगलीच गर्दी जमली होती. मात्र समुद्र किनारी जाताना सावधानता बाळगण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.