मुंबई:  मुंबई, ठाणे आणि कोकणात येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कालही मुंबई आणि कोकणात पावसानं हजेरी लावली. जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात धडकला, मात्र त्यानंतर पावसानं उसंत घेतल्यानं बळीराजा चिंतेत होता. मात्र पुन्हा पावसानं दमदार एन्ट्री घेतल्यानं शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे.


मान्सूनच्या पावसात खंड पडल्यानं राज्यभरात पेरणीही रखडली होती. जोरदार सुरुवात केलेला मान्सून दडून बसल्यानं राज्यातील शेतकरी काहीसा चिंताग्रस्त झाला होता. मात्र येत्या काही दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासात कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. तर उर्वरीत राज्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे.

कोकणात जोरदार सरी

कालपासून कोकणात पावसानं जोरदार हजेरी लावली. किनार पट्टीच्या भागामध्ये पावसाने एन्ट्री घेतली. तर तळकोकणात पावसाच्या हलक्या सरी  पाहायला मिळतायत. राजापूर, लांजा, रत्नागिरी, चिपळूण या भागामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. उत्तर आणि दक्षिण रत्नागिरीमध्येही पावसाचं प्रमाण अधिक आहे.

सिंधुदुर्गात गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झालेल्या पावसाने कालपासून पुनरागमन केलं. कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग परिसरात अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. तर पुढच्या 24 तासातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पालघरमध्ये चार बुडाले

पालघरच्या केळवे समुद्रात 4 जण बुडालेत. यापैकी दोघांचा मृतदेह हाती लागलाय. नालासोपाराहून 7 मुलांचा ग्रुप केळव्याला फिरण्यासाठी गेला होता, मात्र तीन जणांनी पाण्याचा अंदाज घेत किनाऱ्यांवर राहणं पसंद केलं. मात्र उरलेले 4 जण समुद्रात गेले आणि त्यात चारही जण बुडाल्याची भीती व्यक्त होतेय.

मद्यधुंद तरुणाची धबधब्यात उडी

बेळगावातील घटप्रभा नदीवर असणाऱ्या गोकाक या धबधब्यावर गेलेल्या तरूणाला स्टंट करणं जीवावर बेतलंय. उस्मान असं या तरुणाचं नाव आहे.

रमजान ईदचा सण साजरा  करून 35 वर्षीय  उस्मान त्याच्या भावासोबत धबधब्यावर गेला होता. मात्र त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे उस्मान धबधब्याच्या टोकापर्यंत आला आणि पाय घसरून थेट 50 फूट खोल धबधब्यात उडी घेतली. आणि नाहक जीव गमावला. त्यामुळे पावसाळ्याची मजा घ्या पण जीवावर बेतेल असे धाडसी प्रयोग करायला जाऊ नका.