Rahul Gandhi : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना हायकोर्टानं दिलेला दिलासा कायम ठेवत त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी 18 जानेवारीपर्यंत स्थगित केली आहे. तसेच गिरगाव दंडाधिकारी कोर्टाला याप्रकरणी 25 जानेवारीपर्यंत सुनावणी न घेण्याचे निर्देश गुरूवारी जारी केलेत. याप्रकरणी आता जानेवारीतच सुनावणी घेण्यात यावी अशी दोन्ही बाजूंकडनं विनंती करण्यात आल्यानं न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी ही सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केली.


काय आहे राहुल गांधींची याचिका?


राफेल विमान खरेदी व्यवहारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टीका केल्याच्या आरोप करत राहुल गांधींविरोधात मुंबईत साल 2019 मध्ये मानहानीचा खटला दाखल झाला आहे. या दाव्यावर फौजदारी कारवाई सुरू करण्याचे आदेश गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिले असून त्याबाबत राहुल गांधींना कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले गेले होते. याचप्रकरणी दाखल झालेली तक्रार रद्द करण्यासाठी राहुल गांधी यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 


काय आहे प्रकरण? 


राहुल गांधी यांनी राफेलबाबत टीका करताना मोदी यांच्यावर 'कमांडर इन थीफ', 'चौकिदार चोर है', 'चोरो का सरदार'अशी टीका केली होती. यामुळे मोदी यांच्यासह भारतीय जनता पार्टी व त्यातील सदस्यांचीही प्रतिम मलिन झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकत भाजपचे कार्यकर्ते महेश श्रीश्रीमल यांनी ही तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधी यांनी जयपूर, राजस्थान, अमेठी येथील दौऱ्यामध्ये केलेल्या विधानांमध्ये या याचिकेत समावेश आहे. तक्रारदार हे भाजपचे सदस्य असल्यामुळे ते अशाप्रकारची तक्रार करण्याचा अधिकार त्यांना आहे, असं मत व्यक्त करत या गिरगाव दंडाधिकारी कोर्टानं याची दखल घेत राहुल गांधींच्या नावे समन्स जारी केलं होतं. याशिवाय राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी आणि शिवडी न्यायालयातही मानहानीच्या तक्रारी प्रलंबित आहेत. 


20 सप्टेंबर 2018 रोजी जयपूरच्या एका सभेत राहुल गांधींनी, "गली गली मे शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है" असा नारा दिला होता. तसेच 24 सप्टेंबरला एक ट्विट करून राहुल गांधींनी मोदींना उद्देशून अपमानकारक, मानहानीकारक विधानं केली होती. ज्यामुळे तमाम भारतीयांची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन झाल्याचा दावा या तक्रारीतून करण्यात आला आहे. देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीच्याबाबतीत अशी विधान करून राहुल गांधींनी भाजपच्या तमाम कार्यकर्त्यांचाही अपमान केला आहे. असा दावा या याचिकेतून करत तक्रार दाखल करण्यात आली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा