Navneet Rana And Ravi Rana : राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापूर्वी 26 एप्रिल रोजी राणा दाम्पत्याच्या जामीन याचिकेवर सुनावणी पार पडली होती. त्यावेळी झालेल्या सुनावणी दरम्यान, आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या दाम्पत्याच्या जामिन याचिकेवर 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश सत्र न्यायालयाच्यावतीनं राज्य सरकारला देण्यात आले होते. त्यामुळे, आज राणा दाम्पत्याच्या जामिन याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयात राज्य सरकार उत्तर देणार आहे. दरम्यान, सध्या राणा दाम्पत्य न्यायालयीनं कोठडीत आहे. खासदार नवनीत राणा भायखळा कारागृहात आहेत, तर आमदार रवी राणा तळोजा कारागृहात आहेत. 


राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्यानं जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. याआधी त्यांनी जामिनासाठी न्यायदंडाधिकारी कोर्टात याचिका केली होती. मात्र राजद्रोहाच्या आरोपांसाठी जामीन देण्याचा अधिकार दंडाधिकारी कोर्टाला नाही. त्यामुळे वेळ वाया न घालवता ही याचिका त्यांनी मागे घेतली आणि राणा दाम्पत्यानं थेट सत्र न्यायालय गाठलं. 26 एप्रिलला या प्रकरणावर सुनावणी पार पडली होती. या सुनावणीत मुंबई सत्र न्यायालयानं राणा दाम्पत्याच्या जामीन याचिकेवर 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. याआधी पोलिसांसोबत हुज्जत घातल्याच्या प्रकरणात राणा दाम्पत्याची एफआयआर रद्द करण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली होती. 


नेमकं प्रकरण काय? 


सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यांवरुन राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याची घोषणा केली होती. नवनीत राणा यांच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झालं, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता. 


तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता, त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्यानं आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी जाणार नसल्याचं राणा दाम्पत्यानं व्हिडीओ जारी करत सांगितलं आणि या नाट्यावर पडदा पडला. पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केलं गेलं. न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर त्यांच्या जामीन अर्जावर तातडीची सुनावणी नामंजूर करत 29 एप्रिलला सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर राणा दाम्पत्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. सध्या राणा दाम्पत्य कारागृहात असून खासदार नवनीत राणा भायखळा कारागृहात आहेत, तर आमदार रवी राणा तळोजा कारागृहात आहेत.