दादरमधील चैत्यभूमीवर भीमज्योत उभारण्यास राज्य सरकारची मान्यता, 15 दिवसात भूमीपूजन
एबीपी माझा वेब टीम | 12 Jun 2019 08:48 AM (IST)
मुंबईतल्या दादर येथील चैत्यभूमीवर अखंड भीमज्योत उभारण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. येत्या 15 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ज्योतचे भूमीपूजन होईल.
chaityabhoomi - GettyImages-
मुंबई : मुंबईतल्या दादर येथील चैत्यभूमीवर अखंड भीमज्योत उभारण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. येत्या 15 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ज्योतचे भूमीपूजन होईल. फोर्ट येथील (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ) हुतात्मा चौकाच्या धर्तीवर या भीमज्योतची उभारणी केली जाणार आहे. मंगळवारी मंत्रालयात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापालिका अधिकारी, आंबेडकरी संघटना, चैत्यभूमी समन्वय समितीचे सदस्य, आमदार कालिदास कोळंबकर आणि भाई गिरकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत भीमज्योतला मान्यता देण्यात आली आहे. हुतात्मा चौकातील ज्योतीप्रमाणे चैत्यभूमीवरील भीमज्योतही अखंडपणे तेवत राहील. दररोज शेकडो लोक चैत्यभूमीला भेट देतात. तसेच 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि 6 डिसेंबर रोजी पुण्यतिथीनिमित्त देशभरातून बाबासाहेबांचे लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी येतात. हे सर्व अनुयायी या भीमज्योतलाही अभिवादन करु शकतील.