मुंबई : नव्याने निवडून आलेले काही संसदसदस्य तसेच विधानमंडळ सदस्य शपथ घेताना निर्धारित प्रारुपातील शपथ न घेता, त्यामध्ये आपल्या पक्षाचे नेते तसेच आराध्य व्यक्तींची नावे जोडून शपथ घेत असल्याचे नमूद करून या संदर्भात सर्व संबंधितांकरिता निश्चित अशी मार्गदर्शक तत्वे/आचारसंहिता ठरवून देण्याची विनंती महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे.


महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या शपथविधीच्या वेळी देखील विविध घोषणा दिल्यामुळे राज्यपालांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार अंकाला सुरुवात झाली होती. आता राज्यपाल यांनी थेट उपराष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून मंत्री आणि सदस्यांना शपथ घेण्याबाबत मार्गदर्शक तत्वे ठरवून देण्याची मागणी केली.


...म्हणून राज्यपाल चिडले आणि काँग्रेसच्या के सी पाडवींना पुन्हा शपथ घ्यायला लावली


उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना स्वतंत्र पत्र पाठवून राज्यपालांनी शपथ ग्रहण विधीचे पावित्र्य व गांभीर्य जतन करण्यासाठी अशा प्रकारच्या मार्गदर्शक तत्वांची गरज असल्याचे नमूद केले आहे. आपल्या आवडत्या पक्ष नेत्यांचे अथवा आपली श्रद्धा व निष्ठा आहे, अशा आराध्य व्यक्तींचे नाव शपथेच्या प्रारूपामध्ये जोडल्यामुळे शपथ विधी प्रक्रियेचे गांभीर्य कमी होते, असे भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.


महाराष्ट्रात मंत्रीपदाची शपथ देताना काही सदस्यांना आपण शपथ ‘लिहिली आहे त्याच स्वरुपात कुठलीही नावे न जोडता’ पुन्हा वाचण्याची सूचना केली होती, याचे राज्यपालांनी आपल्या पत्रात स्मरण केले आहे. शपथेच्या प्रारूपापासून फारकत घेण्यासंदर्भातील या विषयावर आपल्या स्तरावर विचार विनिमय करून सर्व संबंधितांना योग्य सूचना/मार्गदर्शक तत्वे देऊन शपथ विधी प्रक्रियेचे पावित्र्य जतन करण्याची विनंती राज्यपालांनी आपल्या पत्राद्वारे उभय पीठासीन अधिकार्‍यांना केली आहे.


Bhagat Singh Koshyari | महाविकासआघाडीच्या शपथविधी सोहळ्यावर राज्यपाल कोश्यारी नाराज : सूत्र | ABP Majha