मुंबई : विध्वसंक प्रकल्प कोकणात आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. तुमच्या जमिनी बळकावण्याचे परप्रांतीयांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, तुम्ही तुमच्या जमिनी देऊ नका, तुम्ही सावधान राहा, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला आहे. मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिरात कोकणातील मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे बोलत होते.


जमीन हातातून गेली की अस्तित्त्व संपलं
कोकणातील जमिनीबाबत राज ठाकरे म्हणाले की,  "ही भूमी आपली आहे. कोकणासारख्या पवित्र भूमीकडे आपलं दुर्लक्ष होतंय. त्यामुळे बाकीचे इथे घुसत आहेत. आमचे लोक जमिनी विकून मोकळे होत आहेत. पण एकदा जमीन हातातून गेली की तुमचं अस्तित्व संपलं. तुम्हाला कोणीही विचारणार नाही. आपल्याला आपल्या भूमीचं महत्त्व समजलेलं नाही. त्या जमिनीकडे तुम्हाला लक्ष द्यावच लागेल.

कोकणाची वाट लावणारे प्रकल्प आणण्याचे प्रयत्न
अनेक आमदार, खासदार तिथून आले. कोकणाची वाट लागू शकते, असे प्रकल्प आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कोकणाची जमीन ही त्यासाठी नाही, ते प्रकल्प दुसरीकडे हलवता येतात. कोकणची भूमी हे केरळसारखीच आहे. पर्यटनात केरळच पुढे जाऊ शकतो, मग आपलं कोकण का नाही? पण हा विचार करतच नाही. या गोष्टी करण्यासाठी राजकीय बळ लागतं, असंही राज ठाकरे यांनी सुनावलं.

एकट्या दापोलीत चार भारतरत्न
या भूमीने आतापर्यंत काय काय दिलं. देशातल्या अनेक राज्यांमधून भारतरत्न देतात. महाराष्ट्राला जी आठ भारतरत्न मिळाली आहेत. पा वा काणे, धोंडू केशव कर्वे, विनोबा भावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, भीमसेन जोशी आणि  जे आर डी टाटा महाराष्ट्रातल्या या मान्यवरांना भारतरत्न मिळाला आहे. त्यापैकी एकट्या दापोली तालुक्यात चार भारतरत्न आहेत. ज्या कोकणाने भारताला महान माणसं दिली आहेच आणि आम्ही फक्त गणपतीला गावाला जाऊन येतोय, असं राज ठाकरे म्हणाले.

रस्ते कंत्राटदारांना आपल्या पद्धतीने जाब विचारा
मुंबई-गोवा हायवेवरील अवस्थेवरुन राज ठाकरे म्हणाले की, "कोकणात नवीन रस्ते बांधले आहेत म्हणे. जेवढे नवीन रस्ते बांधले ते उखडले आहेत. गणपतीला गावाला जाताना तुमच्या मणक्यांना कळेलच ते. आज हजारो रुपये कोटी खर्च करतायत, आपण कुठे रस्ते बांधतोय, याचं भान नाही. फक्त पैसे खर्च केले जातात. रस्ते बांधले जात आहे. पाऊस पडला, दरडी कोसळल्या की आमचे रस्ते खराब, खड्डे पडायला सुरुवात. या रस्त्यांचे कंत्राटदार कोण आहे, याचा जाब तुम्ही आपल्या पद्धतीने विचारायला हवा. हजारो कोटी खर्च केले जातात ते काय कंत्राटदार आणि राजकारण्यांच्या घशात घालण्यासाठी? नुसते आकडे फेकले जात आहेत, कामं होत नाही."

राज ठाकरेचं संपूर्ण भाषण