मुंबई : अंडर-19 टीमचा कॅप्टन पृथ्वी शॉनं विश्वचषक उंचावत जगाच्या नकाशावर भारताचा झेंडा अभिमानानं मिरवला. जगभरात त्याचं कौतुक झालं. पण आपल्या घरात तो हक्काच्या चार भिंती आणि एका छतापासून वंचित आहे. त्यामुळे मुंबईत पृथ्वी शॉला हक्काचं घर मिळावं, अशी मागणी शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस यांनी केली आहे. यासंबंधी ते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.


पृथ्वी शॉ आधी विरारला राहत होता. मात्र, त्यानं 2013 ला हॅरीस शिल्डमध्ये 500 धावा फटकावल्यानंतर आमदार पोतनीस यांनी त्याची व्यवस्था वाकोल्याच्या एसआरए कॉलनीत केली. मात्र, ही जागा अपुरी असून ती कायमस्वरुपी वास्तव्यासाठी नाही. त्यामुळे पृथ्वीला हक्काचं घर देऊन त्याला सन्मान द्यावा अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली आहे.

पृथ्वी शॉ नावाचा हिरा

पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतानं अंडर नाईन्टिनचा विश्वचषक चौथ्यांदा जिंकला. या विश्वचषकात पृथ्वी एक फलंदाज आणि एक कर्णधार म्हणूनही प्रकर्षानं चमकला. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं सहापैकी सहा सामने जिंकून विश्वचषकावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं.

पृथ्वीनं या विश्वचषकात सहा सामन्यांमधल्या पाच डावात 261 धावांचा रतीब घातला. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश होता. तर 94 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली.

भारतीय क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेली मुंबई ही आजही फलंदाजांची खाण आहे. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेसारखे फलंदाज याच मुंबईनं आजच्या टीम इंडियाला दिले आहेत. त्या दोघांच्या खांद्याला खांदा भिडवून लहानाचा मोठा होणारा पृथ्वी हा एक फलंदाजीच्या खाणीतला नवा हिरा आहे. अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या निमित्तानं त्या हिऱ्याला राहुल द्रविड नावाच्या कारागिरानं पैलू पाडले. त्यामुळं पृथ्वी शॉ नावाचा हिरा आता आणखी तेजानं झळाळू लागला आहे. त्यामुळे आता त्याला मुंबईत हक्काचं घर मिळावं अशीच सर्वांची अपेक्षा आहे.

संबंधित बातम्या :

अंडर-19 भारतीय संघाचं मुंबईत जंगी स्वागत

कर्णधार पृथ्वी शॉला MCAकडूनंही मोठं इनाम!

वय वर्षे 18, पृथ्वी शॉ विश्वचषक जिंकणारा सर्वात युवा कर्णधार

ऐतिहासिक विजयानंतर BCCIकडून टीम इंडियाला खास बक्षीस!