मुंबई: अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असणाऱ्या गणपती बाप्पााच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लगबग सुरु आहे. कोकणातील गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग राहिला आहे. यासाठी दरवर्षी मुंबईसह अन्य शहरांमधील हजारो चाकरमनी गणपती उत्सवाच्या (Ganpati Utsav 2024) काळात कोकणातील आपापल्या गावी जातात. मात्र, यंदा गणेशोत्सवाच्या (Ganesh Utsav 2024) तोंडावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अर्थात एसटी (ST employees) कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्याने चाकरमान्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. 


ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने एसटी महामंडळाकडून नियोजन करण्यास सुरुवात झाली आहे. गणपतीच्या काळात कोकणात जाण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे या काळात कोकणात विशेष एसटी बसेस सोडल्या जातात.  मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना आंदोलनामध्ये भाग न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आता किती एसटी कर्मचारी आणि कोणत्या संघटना या आंदोलनात सहभागी होणार? हे पाहावे लागेल. 


याशिवाय, एसटी स्थानकांवर आवश्यक तो पोलिस बंदोबस्त लावण्यात यावा, यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. आंदोलनावेळी बसस्थानकात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यादृष्टीने दक्षता घेतली जात आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे कुठल्याही डेपोत एसटी बसच्या फेऱ्या रद्द झाल्यास त्याच्या सूचना मध्यवर्ती कार्यालयात दिल्या जातील. जेणेकरून एसटी प्रशासनाकडून प्रवाशांसाठी पर्याची बसेसची सोय केली जाईल.


काय आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या?


राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे,  प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच 4849 कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांऐवजी सरसकट 5000 रुपये हजार मिळावेत अशा मागण्या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत.


गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांचा एसटीला उदंड प्रतिसाद


अवघ्या काही दिवसांमध्ये गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या  चाकरमान्यांनी पहिली पसंती एसटीला दिली आहे. त्यामुळे 4200 गट आरक्षणासह एकूण 4953 जादा बसेस आतापर्यंत फुल्ल झालेले आहेत. 


मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांसाठी गणपती उत्सवाला कोकणात जाण्याकरिता अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा ०३ सप्टेंबर ते ०७ सप्टेंबर दरम्यान 5000 जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. 3 सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.


गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा , कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. मुंबई तुन कोकणात थेट आपल्या गावी अगदी वाडी-वस्ती पर्यंत फक्त एसटीच चाकरमान्यांना सुखरूप पोहोचवते. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा एसटीतर्फे सर्व विक्रम तोडून सुमारे ५००० जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. 


अर्थात, गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून, ३ ते ७ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.


आणखी वाचा


...अन्यथा गणेशोत्सव काळात मोठं आंदोलन छेडणार, एसटी कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारला गंभीर इशारा