धुक्यामुळे मुंबई लोकल मंदावली
एबीपी माझा वेब टीम | 04 Sep 2017 11:57 AM (IST)
पावसाने झोडपून काढल्यानंतर कल्याण-डोंबिवलीवर आज सकाळी दाट धुक्याची चादर पसरली. त्यामुळं याचा रेल्वेसेवेला फटका बसला.
मुंबई: पावसाने झोडपून काढल्यानंतर कल्याण-डोंबिवलीवर आज सकाळी दाट धुक्याची चादर पसरली. त्यामुळं याचा रेल्वेसेवेला फटका बसला. आज सकाळी कल्याण-डोंबिवली, दिवा, अंबरनाथ-बदलापूर, वासिंद-आसनगाव भागात मोठ्या प्रमाणात धुकं पसरलं. नागरिकांना यामुळे सुखद धक्का बसला असला, तरी चाकरमान्यांना यामुळे त्रासच सोसावा लागला. कारण दृश्यता कमी झाल्यानं रेल्वेचा वेग मंदावला आणि वेळापत्रक कोलमडलं. अगदी सकाळी 11 वाजेपर्यंत यामुळे रेल्वेसेवा उशिरानं सुरू होती. रस्ते वाहतुकीवर मात्र याचा फारसा परिणाम झाला नाही. नाशिक महामार्ग आणि शहरांतर्गत रस्तेवाहतुक सुरळीत होती.