मुंबई : शक्ती मिल सामूहिक बलात्कारप्रकरणी फाशीच्या शिक्षेला आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात दिलेले आव्हान न्यायालयाने फेटाळून लावले आहे. त्यामुळे ही शिक्षा निश्चित करण्याच्या याचिकेवरील अंतिम सुनावणीला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. शक्ती मिल बलात्कारप्रकरणी सुनावलेली फाशीची शिक्षा ही कायद्याच्या चौकटीत बसणारी आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे. राज्य सरकारने ही फाशी निश्चित करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. बलात्कार हा हत्येपेक्षा भयंकर गुन्हा आहे. कारण इथे केवळ पीडितेच्या शरीरावरच नाही तर आत्म्यावरही हल्ला होतो. बलात्काराच्या मानसिक धक्यातून पीडितेला सावरण्यास बराच मोठा कालावधी जातो. के. ई. एम. रुग्णालयातील नर्स अरूणा शानबाग या अखेरच्या श्वासापर्यंत यातून सावरु शकल्या नाहीत. त्यामुळे बलात्कारांची वाढती संख्या आणि समाजात वाढत जाणारा रोष पाहता कायद्यातील नव्या सुधारणेनुसार शक्ती मिल बलात्कारप्रकरणी दिलेली फाशीची शिक्षा योग्यच असल्याचा दावा राज्य सरकार आणि केंद्र सरकारने उच्च न्यायालयात केला आहे. मुंबईसह संपूर्ण देशाला हादरुवन टाकणाऱ्या शक्ती मिल गँगरेपप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या तिघांनी सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर केंद्र सरकारने कलम 376(ई) या कायद्यात सुधारणा केली आहे. त्यानुसार संबधित आरोपीने दोन किंवा त्याहून अधिक वेळा बलात्काराचा गुन्हा केल्यास न्यायालय त्याला जन्मठेपेची अथवा फाशीची शिक्षा ठोठावू शकतं, अशी नव्यानं तरतूद करण्यात आली आहे.