अर्धनग्न मोर्चेकरी शेतकऱ्यांना मुंबईच्या वेशीवर अडवलं
एबीपी माझा वेब टीम | 20 Jan 2019 04:24 PM (IST)
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी खंडाळा तहसील कार्यालय ते मंत्रालय असा अर्ध नग्न मोर्चा काढला. मात्र, सकाळी हा मोर्चा वाशीचा खाडी पूल ओलांडून मानखुर्दच्या बाजूला पोहोचला असताना मुंबई पोलिसांनी मोर्चा अडवला. यावेळी मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी वाहतूक कोंडीचं कारण दिलं आहे.
मुंबई : साताऱ्यातील खंडाळा गावातून अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांना मुंबईत अडवण्यात आलं आहे. मानखुर्द इथं पोलिसांनी हा मोर्चा अडवला. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून जमिनी संपादित करताना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर जलसमाधी घेऊ, असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी खंडाळा तहसील कार्यालय ते मंत्रालय असा अर्ध नग्न मोर्चा काढला आहे. गेल्या 10 वर्षांपासून या भूसंपादनाला शेतकरी विरोध करत आहेत, मात्र याकडे सातत्यानं दुर्लक्ष होत असल्यानं अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचं अस्त्र उपसलं. काल हा मोर्चा नवी मुंबईत धडकला होता. आज मुंबईकडे आगेकूच करताना मात्र त्यांचं म्हणणं ऐकण्याऐवजी पोलिसांनी त्यांचा मोर्चाच अडवला. सकाळी हा मोर्चा वाशीचा खाडी पूल ओलांडून मानखुर्दच्या बाजूला पोहोचला असताना मुंबई पोलिसांनी मोर्चा अडवला. यावेळी मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी वाहतूक कोंडीचं कारण दिलं आहे. दरम्यान सकाळपासून पोटात अन्नाचा कणही नसलेल्या या मोर्चेकऱ्यांना अखेर दुपारी त्यांच्याच गावातल्या बांधवांनी जेवणं करून आणून दिलं. पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी मोर्चेकरी शेतकऱ्यांशी चर्चा केली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एमआयडीसीकडून जमिनी संपादित करताना प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल करुन फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सातारा जिल्ह्यातल्या धनगरवाडी, केसुर्डी, शिवाजीनगर, खंडाळा, बावडा, मोर्वे, भादे, अहिरे गावातील शेतकरी खंडाळ्याहून अर्धनग्नावस्थेत पायी चालत आले आहेत.