Sanjay Raut : ईडी अधिकाऱ्यांसाठी खंडणी वसूल करत असल्याचा आरोप असलेले जितेंद्र नवलानी यांची एसआयटी चौकशी बंद करण्यात आली आहे. राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात ही माहिती दिली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यवसायिक जितेंद्र नवलानी यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना एसआयटी चौकशी सुरू करण्यात आली होती. 


मुंबईतील व्यावसायिक जितेंद्र नवलानी हा ईडी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून बिल्डरांकडून वसुली रैकेट चालवत असल्याचा संजय राऊत यांनी आरोप केला होता. वर्ष 2015 ते 2021 दरम्यान नवलानी यांनी ईडी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करत जवळपास 58.96 कोटी खंडणी म्हणून वसूल केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. जितेंद्र नवलानी हे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात येत होता.


या आरोपांची चौकशी करण्याकरिता मुंबई पोलिसांचे एक विशेष पथक तयार  करण्यात आले होते. या प्रकरणात अँटी करप्शन ब्युरोनं मे महिन्यात गुन्हा दाखल केला होता. एसबीकडून जितेंद्र नवलानीविरोधात लूक आउट नोटीस जारी केली होती. 


बुधवारी मुंबई हायकोर्टात  न्या. नितीन जमादार आणि न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी सरकारी वकील अॅड. अरुणा पै यांनी एसआयटी चौकशी बंद करण्यात आली असल्याची माहिती दिली. 


जितेंद्र नवलानी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या चौकशी अधिकारी आणि सरकारी वकिलांमध्ये 5 जूलै रोजी या प्रकरणाच्या अनुषंगाने चर्चा झाली होती. त्यामध्ये चौकशी अधिकाऱ्यांनी एसआयटी चौकशी बंद करण्यात येत असल्याची माहिती दिली. एसआयटीला खंडणी आणि फसवणूक केल्याच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य आढळले नसल्याने मुंबई पोलिस आयुक्तांच्या परवानगीने ही एसआयटी चौकशी बंद करण्यात आली आहे.


दरम्यान, संजय राऊत यांनी आरोप केल्यानंतर शिवसेनेच्या एका नेत्याने जितेंद्र नवलानीची मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. त्यानंतर याच्या चौकशीसाठी विशेष चौकशी पथक स्थापन करण्यात आले. या पथकानेदेखील नवलानीला चौकशीसाठी अनेकदा समन्स बजावले होते.