मुंबई : राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता खेड्यापाड्यातील उमेदवारांना अन्य जिल्ह्याच्या परीक्षा केंद्रांवर उपस्थितीत राहण्यास अडचणी येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी आयोगाने 11 ऑक्‍टोबरला होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीने जिल्हा केंद्र निवडण्याची संधी दिली आहे. तर 20 सप्टेंबरच्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी पुणे केंद्र निवडलेल्या दुसऱ्या विभागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्यासाठी आयोगाने 20 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.


जिल्हा केंद्र निवड न करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेसाठी भरलेल्या त्यांच्या अर्जातील कायमस्वरुपी रहिवासीचा पत्ता असलेल्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळणार आहे. जिल्हा केंद्राची क्षमता संपुष्टात आल्यानंतर जिल्हा केंद्राची निवड न करणाऱ्या अथवा निवड करु न शकलेल्या उमेदवाराला आयोगाकडून उपलब्ध केलेल्या केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे. नव्याने जिल्हा केंद्र निवडण्यासाठी सर्व उमेदवारांना त्यांच्या आयोगाकडील नोंदणीकृत मोबाईल, दूरध्वनी क्रमांकावर लघुसंदेश दिला जाणार असून व्यवस्थेप्रमाणे निवडण्यात आलेल्या जिल्हा केंद्र बदलण्याची विनंती यापुढे कोणत्याही कारणास्तव मान्य केली जाणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांच्या हितासाठीच घेतले निर्णय...

राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता खेड्यापाड्यातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना सध्याच्या परिस्थितीत अन्य जिल्ह्याच्या परीक्षा केंद्रांवर उपस्थितीत राहण्यास अडचणींचा सामाना करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी आयोगाने आता सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणचे सोयीचे परीक्षा केंद्र निवडण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सुनिल आवताडे यांनी दिली आहे.

ठळक बाबी...

  • राज्यसेवेची दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 11 ऑक्‍टोबर (रविवारी) रोजी घेण्याचे प्रस्तावित आहे.

  • लॉकडाउनमुळे बहुतांश विद्यार्थी त्यांच्या मूळगावी गेले असून त्यांच्या सोयीसाठी आयोगाने आपला निर्णय बदलला.

  • सद्यस्थितीत प्रवासावरील व तात्पुरत्या वास्तव्यावरील निर्बंध पाहून आयोगाने सर्वच उमेदवारांना जिल्हा केंद्र निवडण्याची संधी दिलीय.

  • 21 ऑगस्टपासून दुपारी दोन ते 26 ऑगस्टपर्यंत रात्री 23.59 वाजेपर्यंत परीक्षा केंद्र निवडता येणार आहे,

  • जिल्हा केंद्रांवर उमेदवारांना प्रवेश द्यावयाची कमाल क्षमता निश्‍चित करुन प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असणार आहे.

  • संबंधित जिल्ह्यांमधील शाळा-महाविद्यालयांच्या स्थानिक पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेनुसार प्रवेशाची कमाल क्षमता निश्‍चित केली आहे.


MPSCच्या पूर्वपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यात केंद्र देण्याची मागणी, आमदार कपिल पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र