शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकारला धोका नाही : रामदास आठवले
एबीपी माझा वेब टीम | 24 Sep 2017 05:47 PM (IST)
शिवसेनेने पाठिंबा काढला तरी सरकार स्थिर राहिल असा दावा रामदास आठवलेंनी केला. शिवाय त्यांनी नारायण राणेंना रिपाइंत येण्याची ऑफरही दिली.
मुंबई : शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडू नये आणि जरी शिवसेना बाहेर पडलीच तरी सरकार स्थिर राहिल, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केला आहे. मुंबईतल्या दादर चौपाटीवर आज स्वच्छता मोहिम राबवली गेली. यावेळी ते बोलत होते. शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यानंतर आमदारांची गरज भासल्यास राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीनेही पाठिंबा नाही दिला तरी सरकार स्थिर राहण्यासाठी 15 आमदारांची गरज आहे. 15 आमदार सहज पाठिंबा देतील, कारण तीन वर्षात पुन्हा निवडणूक घेण्याची आमदारांची इच्छा नाही, असंही रामदास आठवले म्हणाले. राणेंना रिपाइंत येण्याची ऑफर दरम्यान काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर आता नारायण राणेंनी रिपाइंत यावं, अशी ऑफरही रामदास आठवलेंनी दिली. राणे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना मुख्यमंत्रीपदाचा अनुभव आहे. रिपाइंला त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल, असंही ते म्हणाले. “तुम्ही काय माझी हकालपट्टी करता, मीच काँग्रेस सोडतो,” अशा शब्दात नारायण राणे यांनी विधानपरिषद आमदारकीचा आणि काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. कुडाळमधील पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. पाहा व्हिडिओ :