मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाचं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी स्वागत केलं आहे. सरकारने 2 लाखापर्यंत कर्जमाफी करण्याचा घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे समाधान देणारा नसला तरी दिलासा देणारा नक्कीच आहे, असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं आहे.


काल(21 डिसेंबर)महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी काय निकष असणार? किती लोक यामध्ये लाभार्थी होतील, मागच्या सरकारने दिलेल्या कर्जमाफीमध्ये किती लोक राहिले? त्यांना काही लाभ होईल का? असं सांगत जोपर्यंत कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया जाहीर होत नाही. तोपर्यंत त्यावर भाष्य करणे योग्य राहणार नसल्याचे खडसे म्हणाले.

तोपर्यंत गैरव्यवहार झाला म्हणता येणार नाही -
फडणवीस सरकारच्या काळात 65 हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय कॅगच्या अहवालात व्यक्त करण्यात आला होता. मात्र, याबाबत सरकार उपयोगिता प्रमाणपत्र किती सादर करते? यावरुन यात गैरव्यवहार झाला की नाही ते स्पष्ट होईल, असे खडसे यांनी स्पष्ट केले. हा दरवर्षीचा हा भार असतो. आजच 65 हजार कोंटी रुपयांचं समोर आलं असं नाहीये. काँग्रेसच्या काळातही अशाच प्रकारची प्रकरणं बाहेर आली होती. परंतु, जर उपयोगिता प्रमाणपत्र बाहेर आले नाही तर, हा गैरव्यवहारच असतो. त्यामुळे उपयोगिता प्रमाणपत्र कितीचे येते यावर हे सर्व अवलंबून आहे. मात्र, त्याअगोदरच गैरव्यवहार झाला म्हणणे योग्य ठरणार नाही.

पक्षांतरची बातमी चुकीची - 
माझ्या पक्षांतर करणार असल्याच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. पक्षाला दहा दिवसांची मुदत दिली? अशा देखील बातम्या येत आहेत. मात्र, ही चुकीची माहिती आहे. कारण, अशा प्रकारे कोणत्याही पक्षाला मुदत देता येत नाही. कारण, मलाही पक्ष चालवण्याचा अनुभव आहे. माध्यमांमध्ये सुरु असलेल्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या आहेत, असे सांगत खडसे यांनी या चर्चांना सध्यातरी पूर्णविराम दिला आहे.

हिवाळी अधिवेशनात काय? -
या हिवाळी अधिवेशनात महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ, गोरगरीबांना 10 रुपयामध्ये शिवभोजन योजना, पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प, समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकार पैसा देणार, समृद्धी महामार्गालगतच्या विकास प्रकल्पातून पाच लाख रोजगार निर्माण करणार, कृषी समृद्धी केंद्रांमध्ये कृषी विकास प्रकल्पाची स्थापना अशा निर्णयासह अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. सोबतच अधिवेशनात सात महत्वाची विधेयकं सुद्धा मंजूर करण्यात आली.

हेही वाचा - हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं, अधिवेशनात ही महत्वाची विधेयकं मंजूर

Eknath Khadse on Loan Waiver | शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचं एकनाथ खडसेंकडून स्वागत | ABP Majha