प्रचार सोडून मनसेच्या उमेदवाराची पोलीस स्टेशनवारी
एबीपी माझा वेब टीम | 10 Oct 2019 11:52 PM (IST)
ठाण्यातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सरकार विरोधात केलेले उपहासात्मक आंदोलन करणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला चांगलंच महागात पडल्याचे दिसत आहे.
ठाणे : ठाण्यातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सरकार विरोधात केलेले उपहासात्मक आंदोलन करणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला चांगलंच महागात पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे या उमेदवाराला प्रचार सोडून थेट पोलीस स्टेशनचे खेटे घालावे लागत आहेत. मनसेचे ठाण्यातील ओवळा माजीवडा मतदारसंघातील उमेदवार संदीप पाचंगे यांनी दोन महिन्यांपूर्वी पावसामुळे ठाण्यातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये मंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांचे व्यंगचित्र रेखाटले होते. त्यावेळी संदीप पाचंगे यांच्यासह मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याबाबत चौकशी करुन अटक करण्याकरता संदीप पाचंगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र निवडणुकीनंतर अटकेची कारवाई होईल, असे सांगून ठाणे सोडून जायचे नाही, अशी ताकीदही दिली आहे. त्यामुळे एकीकडे निवडणूक प्रचार आणि दुसरीकडे अटकेची टांगती तलवार, अशी स्थिती मनसे उमेदवार संदीप पाचंगे यांची झाली आहे.