विरार (ठाणे) : जर तुम्ही विरारच्या समुद्रकिनारी फिरायला जाणार असाल तर थोडी सावधानता बाळगा. कारण विरार येथील अर्नाळा समुद्रकिनारी एका आठ वर्षीय मुलीवर 15 ते 20 भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवून, संपूर्ण शरीरावर जखमा केल्या आहेत. सध्या तिच्यावर विरारच्या सहयोग रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


अपूर्वा तांडेल ही आठ वर्षांची मुलगी अर्नाळा समुद्रकिनाऱ्याजवळच राहते. गुरुवारी पावणे सहाच्या सुमारास समुद्रकिनारी खेळण्यास गेली होती. अचानक पाऊस सुरु झाला आणि अपूर्वा घरी जाण्यासाठी पळायला लागली. तिच्या या पळण्यावर समुद्रकिनारी असलेल्या 15 ते 20 कुत्र्यांच्या घोळक्याने हल्ला चढवला.

अपूर्वाच्या अंगाचे लचके त्या 15 ते 20 कुत्र्यांनी तोडले. किनाऱ्याजवळ असलेल्या इतरांनी बघितल्यावर तिला वाचवण्यासाठी धावले आणि ती थोडक्यात बचावली.

अपूर्वाच्या मानेवर, दोन्ही पायावर, दोन्ही हातावर, कमरेवर तर डोक्यावरही कुत्र्यांनी अमानुषपणे चावा घेतला आहे. हिची ही परिस्थीत बघून डॉक्टर ही आश्चर्यचकित झाले की कुत्र्यांनी एवढ्या अमानुषपणे माणसाचा चावा घेवू शकतात का, यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. या जखमातून अजूनही अपूर्वाच्या अंगातून रक्ताच्या धारा येत आहेत.

अर्नाळा समुद्र किनाऱ्यालगत भटक्या कुत्र्यांची मोठ्या प्रमाणात फौजच आहे. कुणी त्यांच्यासमोरून पळाला की त्याचा पाठलाग करत त्याच्यावर ही टोळी हल्लाच चढवते. मारण्याची मुद्रा आपण केल्यावर थोडा बचाव होतो.

दरम्यान, वसई आणि विरारच्या हद्दीत भटके कुत्रे पालिका पकडून या समुद्र किनारी सोडत असल्याचा आरोप स्थानिक गावकऱ्यांनी केला आहे.