मुंबई : राज्यातील सर्वात मोठी कामगार संघटना म्हणून ओळख असलेल्या माथाडी कामगार संघटनेत आता फूट पडली आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील विरूध्द शशिकांत शिंदे अशा संघर्षाला आता सुरवात झाली आहे. नरेंद्र पाटील यांची गेल्या वर्षभरात भारतीय जनता पक्षाशी जवळीक वाढत गेल्यानंतर शशिंकात शिंदे आणि नरेंद्र पाटील यांच्यात शितयुध्द सुरू झाले आहे.

माथाडी कामगार संघटनेने आतापर्यंत राष्ट्रवादीला साथ दिली होती. शशिकांत शिंदेदेखील राष्ट्रवादीचेच आमदार आहेत. परंतु माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी नरेंद्र पाटील यांनी भाजपशी घरोबा केला. मराठा आंदोलनात सक्रीय असलेल्या नरेंद्र पाटील यांना भाजपने आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्षपदही दिले आहे.

पाटील आणि शिंदे यांच्यात शितयुद्ध होतेच, त्यातच काल (सोमवारी) कळंबोली येथे माथाडी कामगार मेळाव्यात शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टिका करत हे सरकार माथाडी संघटना संपवत असल्याचा गंभीर आरोप केला. या वक्तव्यामुळे माथाडी कामगार संघटनेत मोठी फूट पडली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न सोडवले असून शिंदे यांनी कामगारांच्या प्रश्नासाठी कधीच पाठपुरावा केला नसल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला आहे. त्यामुळे आता लोकांनीच संघटनेतील गद्दारांना शोधून काढा, असे नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे.