ठाणे :एकीकडे राज्य सरकारमध्ये तीन पक्षांचा सहभाग आहे. तीन पक्षांची आघाडी मजबूत असल्याचा दावा केला जातो. हे जरी खरं असलं तरी दुसरीकडे ठाण्यामध्ये एका बॅनरवर केवळ दोनच पक्षातील नेत्यांचे फोटो लावल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ठाणे काँग्रेसने, आम्ही पाठिंबा दिला नसता तर ठाकरे सरकार सत्तेवर आले असते का? अशा आशयाचा पोस्टर लावून खुलेपणाने नाराजी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड या ठाण्यातील दोन मंत्र्यांना देखील काँग्रेस सत्तेत आहे याचा विसर पडला आहे का? असा सवाल ठाणे काँग्रेस अध्यक्षांनी करत त्यांच्यावर जहरी टीका देखील केली आहे.


नुकत्याच मंत्री मंडळाच्या झालेल्या बैठकीत एम एम आर क्षेत्रात असलेल्या 8 महानगरपालिका आणि 7 नगरपालिका स्वतंत्र एस आर ए प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मुंबई सोडून या महानगरपालिका मधील नागरिकांचे विनामूल्य घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण होईल. येण्यासाठी आभार व्यक्त करणारा एक बॅनर स्लम डेव्हलपर्स आणि आर्किटेक्ट असोसिएशनने तीन हात नाक्यावर लावलाय. या बॅनरवर "ठाकरे सरकारची वचनपूर्ती" असे म्हणत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो लावला आहे. याच बॅनर वर स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा देखील फोटो लावण्यात आलेला आहे.


याच बॅनरला ठाणे काँग्रेस अध्यक्षांनी आक्षेप घेतलाय. या बॅनरला उत्तर म्हणून बाजूलाच, "सरकार तिघांचं, मग नाव का फक्त दोघांचं" असा प्रश्न विचारला आहे. "सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला नसता तर जनकल्याण करणारे ठाकरे सरकार, महाराष्ट्रात सत्तेवर आले असते का?" असा थेट प्रश्न विचारून आपली नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी हा बॅनर लावलेला असून एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड या दोघांवर खरमरीत टीका देखील त्यांनी केली आहे.


"ठाण्यातले हे दोन्ही मंत्री काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे झालेत त्याचा त्यांना कदाचित विसर पडला आहे. एकनाथ शिंदे गेल्यावर निखिल पालकमंत्री होते आणि आताही ते पालकमंत्री आहेत त्यांचे नशीब फळफळले आहे, त्याबद्दल आम्हाला काही बोलायचे नाही. मात्र गेल्या वेळी ते ज्योती सरकारचे मंत्री होते आता आमच्या मेहरबानीवर ते मंत्री झाले त्याचा त्यांना विसर पडला आहे", असे विक्रांत चव्हाण यांनी म्हटले आहे. " कालचे मुंगूस आणि साप एकत्र आले आहेत, आम्ही मात्र डोंबाऱ्याचा भूमिकेत आहोत, आम्ही मुंगुसाला आणि सापालही नाचवू शकतो", असे म्हणत अतिशय बोचरी टीका चव्हाण यांनी केली आहे.


महत्वाचं म्हणजे, याच ठाणे काँग्रेसने काही दिवसांपूर्वी ठाण्यात खड्ड्यावरून आंदोलन केले होते. ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून, त्यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे ठाण्यात तरी आघाडीत बिघाडी दिसून येत आहे.