सहाही नगरसेवकांना बदनाम करण्याचं षडयंत्र : दिलीप लांडे
एबीपी माझा वेब टीम | 25 Oct 2017 11:02 PM (IST)
‘सहा नगरसेवकांना बदनाम करण्याचे कारस्थान सुरु असून आम्ही सहाही नगरसेवक शिवसेनेतच आहोत.’
मुंबई : मनसेतून शिवसेनेत आलेल्या सहा नगरसेवकांपैकी 4 जण पुन्हा मनसेत जाणार असल्याच्या बातमीचे खंडन सहाही नगरसेवकांनी एक पत्रक काढून केले आहे. ‘सहा नगरसेवकांना बदनाम करण्याचे कारस्थान सुरु असून आम्ही सहाही नगरसेवक शिवसेनेतच आहोत.’ अशी माहिती नगरसेवक दिलीप लांडे यांनी दिली. ‘मी कोणत्याही पोलीस संरक्षणाची मागणी केलेली नाही. तसेच कोणत्याही धमक्यांना मी भीक घालत नाही. असंही ते म्हणाले. मनसे सोडून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांपैकी चार नगरसेवकांनी पुन्हा मनसेत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असा दावा मनसेने केला आहे. या नगरसेवकांशी संपर्क झाला असून त्यांच्याशी चर्चा सुरु आहे, तसंच या नगरसेवकांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे, असंही मनसेकडून सांगण्यात आलं आहे. या वृत्तानंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली. त्यानंतर शिवसेनेने हे वृत्त फेटाळत, मनसेतून आलेले सहाही नगरसेवक एकत्र असून ते आमच्यासोबतच असल्याचं स्पष्टीकरण दिलं. मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत काही दिवसांपूर्वी 13 ऑक्टोबरला मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक शिवसेनेते गेले होते. त्यामुळे मुंबई महापालिकेतील शिवसेनेचं संख्याबळ वाढलं होतं. मात्र त्यापैकी परमेश्वर कदम, हर्षला मोरे, दत्ताराम नरवणकर, अर्चना भालेराव यांनी मनसेशी संपर्क साधल्याचं सांगितलं जात आहे. मनसेचे नगरसेवक फोडून भाजपला शह भांडुप पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पराभवानंतर भाजप बरीच आक्रमक झाली होती. ‘लवकरच मुंबईत आमचा महापौर बसवू.’ असं वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले होतं. भाजपच्या संभाव्य खेळी लक्षात घेऊन शिवसेनेनं तात्काळ एक भन्नाट चाल खेळत मनसेच्या तब्बल 6 नगरसेवकांना फोडलं होतं. या सर्व घडामोडीत शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र याबाबत मनसेने कोकण आयुक्तांकडे तक्रार केली होती. संबंधित बातम्या : मनसेतून आलेले सर्व सहा नगरसेवक आमच्यासोबतच : शिवसेना