सुरक्षा कमी करुन सरकारचा आव्हाडांना मारण्याचा कट आहे का? : मुंडे
एबीपी माझा वेब टीम | 16 Jan 2019 01:37 PM (IST)
"ही बाब सरकारने गांभीर्याने घ्यावी," असं सांगत यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि छगन भुजबळ यांची सुरक्षाव्यवस्था कमी केल्याने पक्षाच्या नेत्यांमध्ये असंतोष पसरला आहे. दोघांची सुरक्षा कमी करणं ही बाब गंभीर असून निवडणूक तोंडावर असताना असा निर्णय धक्कादायक आहे, असं मत विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. "जितेंद्र आव्हाड यांना धमक्या आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा कमी करुन सरकारने त्यांना मारण्याचा कट रचला आहे का?," असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला आहे. तर छगन भुजबळ मोठे नेते आहेत. ते सरकारवर तुटून पडत असल्याने सरकारने त्यांची सुरक्षा कमी केल्याचा आरोप मुंडेंनी केला. तसंच असं गलिच्छ राजकारण करुन नका, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. "ही बाब सरकारने गांभीर्याने घ्यावी," असं सांगत यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.