मुंबई : मुंबईत पुन्हा पादचारी पूल कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही सभागृहात आणि सभागृहाबाहेरही मुंबईतील सर्व पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची वारंवार मागणी केली होती. सरकार मात्र ढिम्म बसले आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

एल्फिन्स्टनची दुर्घटना झाल्यानंतर मुंबईतील सर्व पूलांचे ऑडिट का केले गेले नाही? या घटनेला कोण जबाबदार आहे? भावनिक राजकारण करत बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी लोकांच्या जीवाची पर्वा करावी. पूलाचे ऑडिट झाले असते तर आज लोकांचा नाहक बळी गेला नसता, असे धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पुलाचा भाग कोसळला आहे. हा पूल कोसळल्याने दोन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत अनेक 34 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत 35 वर्षीय अपूर्वा प्रभू (35) , रंजना तांबे (40 ), जाहीद सिराज खान (32) यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे.  या घटनेतील मृतक महिला जीटी हॉस्पीटलच्या कर्मचारी असल्याची माहिती आहे.





घटनास्थळी अग्निशामक दलाच्या चार गाड्या आणि दोन रुग्णवाहिका पोहोचल्या असून पुलाच्या स्लॅबचा सांगाडा हटविण्याचे काम सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि टाइम्सच्या इमारतीला जोडणारा हा पुलाचा स्लॅब कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. या वेळेला खूप गर्दी असल्याने अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे.





सीएसएमटीजवळ पुलाचा स्लॅब कोसळला, पाहा घटनास्थळाची छायाचित्रे


या घटनेत 34 जण गंभीर जखमी झाले असून जखमींना सेंट जॉर्ज, जीटी आणि सायन रुग्णालयात जखमींना हलवलं आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. घटनास्थळी   सध्या अग्निशमन दलातर्फे मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि पोलीस यांचा समावेश आहे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारीही या ठिकाणी आहेत आणि बचावकार्य राबवत आहेत.

दरम्यान, पिंपरी चिंचवडच्या सुदुंबरे येथून एनडीआरएफची टीम मुंबईकडे रवाना झाली आहे.  सीएसएमटी स्टेशनवर पुलाचा स्लॅब कोसळलेल्या घटनास्थळी पुढील काही वेळात पोहचेल अशी माहिती आहे.

टाइम्स ऑफ इंडिया इमारतीजवळ असलेला हा पादचारी पुलाचा स्लॅब कोसळला आहे. या पुलाचा कामा रूग्णालयानजीकचा भाग कोसळला आहे. या पुलावर असलेला क्राँक्रिट स्लॅब पूर्णपणे पडलं असून आता केवळ पुलाचा सांगाडा उरला आहे. सध्या घटनास्थळावरून गर्दी हटवणं हे सध्याचं पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे. पुलाचा सांगाडा कोसळण्याची भीती असल्याने अग्निशमन दलाचे अधिकारी तेथील गर्दी कमी करण्याचे काम सुरू आहे. ही गर्दी CST स्थानकाकडे हलवण्यात येत आहे.


दोन वर्षांआधीच स्थानिक नगरसेवकांनी या ब्रिजच्या दुरुस्तीबाबत निवेदन दिले होते. मात्र या पुलाचे ऑडिट झाले नाही, असे यावेळी स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी म्हटले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांना या पुलाच्या ऑडिट संदर्भात पत्र दिले होते मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं. या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे नगरसेविका सानप यांनी सांगितले आहे.


VIDEO