मुंबई : नाशिकच्या कुंभमेळ्यातील कामांसाठी गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आणले गेलेत, वरून आदेश आल्यानंतर तसं केलं जातं, असा मोठा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला आहे. त्या आरोपांना आता मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. देशात किंवा राज्यात कंत्राटं देताना कुणाचीही जात किंवा भाषा, धर्म पाहिला जात नाही. ज्यांची कंत्राट पूर्ण करण्याची क्षमता आहे, त्याला कंत्राट दिलं जातं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. तसेच कामांच्या गुणवत्तेची तपासणी केल्यानंतरच पैसे दिले जाणार आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
या कुंभमेळ्यासाठी अनेक कॉन्ट्रॅक्टर गुजरातमधून आणले, असं समजलं आहे. महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्टर जन्मलेच नाहीत का? वरून जे आदेश येतील तसे कुंभमेळे करायचे. महाराष्ट्रातील सगळ्या गोष्टी अशाच हाताळल्या जात असतील तर यांना लखलाभ असो, असं म्हणत राज ठाकरेंनी नाशिकच्या कामांवरून संताप व्यक्त केला होता.
राज ठाकरेंच्या आरोपांवर काय म्हणाले?
राज ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्याला गिरीश महाजन यांनी स्पष्ट सांगितलं आहे. कॉन्ट्रॅक्टर गुजरातचे आहेत वगैरे सगळं खोटं आहे. देशात आणि राज्यात कंत्राटं देताना जात, भाषा, धर्म पाहिलं जात नाही. ज्यांची बिड कॅपॅसिटी असते त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळतंय. त्या कंपनीच्या मागे कोण आहे हे पाहाता येत नाही. कंत्राटं स्पर्धात्मक दिले आहेत, कमी पैशात दिले आहेत. तीन प्रकारच्या गुणवत्ता तपासण्या लावण्यात आल्या आहेत. कामांची गुणवत्ता तपासणी झाल्यानंतरच पैसे मिळणार आहेत.
नाशिकच्या रस्त्यावर काय म्हणाले?
कुंभ मेळ्याची कामं सुरू असतानाही नाशिकमधील खड्ड्यांवरून अनेकदा आरोप केले जात आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नाशिकमध्ये एमएनजीएल कंपनीला गॅस कनेक्शनसाठी पाईपलाइन टाकायला मान्यता दिली होती. त्याची कामं हळू सुरू आहेत. पाईपलाईनसाठी रस्ते उकरण्यात आले आहेत. त्यात घरोघरी कनेक्शन द्यायचे असल्याने उशीर लागत आहे. या कामांमुळे रस्ते करता येत नाहीत. आतापर्यंत दोन लाख कनेक्शन देणं आवश्यक होतं, पण फक्त 44 हजार कनेक्शनचे काम झाले आहे. कुंभमेळ्यामुळे नाशिकमध्ये अनेक ठिकाणी अनेक संस्था कामं करत आहेत. ज्या ठिकाणी कामं सुरू आहेत त्या ठिकाणी महापालिकेने सूचना फलक लावले पाहिजेत.
शेतकरी कर्जमाफीवर काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मला अतिशय आनंद आहे, आपण अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना घोषित केली होती. त्यात आषाढीला पहिली यादी घोषित केली होती. ती यादी आपण ग्रामपंचायतींना पाठवली. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. ते जसजसं होईल तसतसं ही प्रक्रिया पुढे जाईल. आतापर्यंत 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत आणि खाती नील झाली आहे. शासनाने भरलेले पैसे आणि बँकेतील पैसे सारखे असल्याने ती नील झाली आहे. जसे ऑथिंटिकेट अकाऊंट होतील तसे अकाऊंट नील होतील. पैसे टाकण्याची सुरुवात झाली आहे."
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सीबील स्कोअरची शेतकऱ्यांना काहीही समस्या निर्माण होणार नाही. कर्ज मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत. काही अफवा पसरवल्या जाताय, त्यात ओटीएस झालंय म्हणून सीबील लागेल. मात्र तसं नाही आहे, सीबीलची अट लागणार नाही.
ही बातमी वाचा:
