मुंबई:  शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या रोखठोक प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनीही आज तुफान फटकेबाजी केली. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यात संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राऊतांच्या अनेक प्रश्नांना खास शैलीत उत्तरं दिली.


युती कशी होणार?

यावेळी संजय राऊत यांनी आम्ही (शिवसेना) स्वबळावर लढणार आहोत हे सांगितल्यानंतर तुम्हाला कसं कळतं की युती होईल, कोणत्या आत्मविश्वासाने सांगती युती होणारच? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला.

मुख्यमंत्री म्हणाले, “मला जी परिस्थिती दिसते, त्यावरुन सांगतो. त्याचं कारण म्हणजे शिवसेनेचे प्रमुख आज उद्धवजी असतील, तरी तो पक्ष बाळासाहेबांच्या विचाराने चालतो. ज्या वेळी या देशातील तथाकथित सेक्युलर (धर्मनिरपेक्ष) एकत्र होतील, त्या त्या वेळी या देशातील जे खरे सर्वधर्म समभाव मानणारे खरे हिंदुत्ववादी आहेत, त्यांना एकत्र यावंच लागेल. मला हे माहिती आहे, की ही परिस्थिती आल्यानंतर बाळासाहेबांच्या विचाराने चालणाऱ्या पक्षाजवळ दुसरा पर्याय उरणार नाही”.

मुख्यमंत्र्यांची मेगामुलाखत जशीच्या तशी... 

यावर संजय राऊत यांनी प्रतिप्रश्न केला. 2014 ला हाच बाळासाहेबांचा पक्ष होता, तर त्यांच्याशी तुम्ही युती का तोडली?

... तर तुम्ही मुख्यमंत्री झाला असता

त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. “संजयजी आपण त्यावेळी चर्चेत नव्हता. त्यावेळी शिवसेनेचं म्हणणं होतं आम्हाला 151 जागा हव्या. आम्ही म्हणत होतो सेनेने 147 जागा लढाव्या, आम्ही 127 जागा लढू आणि आपल्या मित्रांना 19 जागा देऊ. पण त्यावेळी शिवसेनेने भूमिका घेतली होती की आम्ही 151 चा आकडा घोषित केला आहे. आम्ही त्याखाली येणार नाही. याच मुद्द्यावर युती तुटली.

त्यावेळी युती तुटली नसती, तर 147 पैकी तुमचे (शिवसेना) 120 आले असते, आमचे (भाजप) 127 पैकी 105 आले असते, कदाचित उद्धवजी मुख्यमंत्री झाले असते. त्यांनी मान्य केलं नसतं, तर तुम्ही देखील (संजय राऊत) मुख्यमंत्री झाला असता”.

मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरानंतर संजय राऊत मनापासून हसले.

VIDEO: (6.20 पासून ते 6.40 पर्यंत)


संबंधित बातम्या

मुख्यमंत्र्यांची मेगामुलाखत जशीच्या तशी... 


भाजप-शिवसेना युती झाल्यास मी भाजपमध्ये नसेन : राणे  


राज ठाकरेंच्या टीकेला अक्षय कुमारचं उत्तर