मुंबई:  मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांच्या आकड्यांमध्ये वाढ होतेय. मुंबईत वाढत्या रुग्ण संख्येसमोर आता जागा अपुरी पडत आहे. यामुळं आरोग्य यंत्रणेवर याचा मोठा ताण वाढला आहे. यासाठीच मुंबई महानगरपालिकेने मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA) वानखेडे स्टेडियमचा तात्पुरता ताबा देण्याची मागणी केली आहे.


वानखेडे स्टेडियमचे रुपांतर महापालिकेच्या आपत्कालीन कर्मचाऱ्यांच्या वापरासाठी आणि कोरोना व्हायरस एसिम्प्टोमॅटिक पॉझिटिव्ह रूग्णांना  वेगळे ठेवण्यासाठी एक सेंटर बनवण्याचा बीएमसीचा मानस आहे.



बीएमसीने शुक्रवारी वानखेडे स्टेडियमला विलगीकरण सेंटरमध्ये रूपांतरित करण्याच्या मागणीचे पत्र मुंबई क्रिकेट असोसिएशनला लिहिले आहे. या मैदानाचा वापर मुंबईच्या ‘ए’ प्रभागात राहणाऱ्या आपत्कालीन कर्मचार्‍यांसाठी आणि कोविड-19 पॉझिटिव्ह रूग्णांना वेगळे ठेवण्यासाठी केला जाईल, असे या पत्रात म्हटले आहे.



या जागेचे जे काही भाडे असेल तेही बीएमसीकडून वेळोवेळी दिले जाईल असेही या पत्रात लिहिले आहे. बीएमसीने पुढे म्हटले आहे की, हे अधिग्रहण तात्पुरते असणार आहे आणि त्यामुळे या मैदानाबाबत कोणताही कायदेशीर हक्क बीएमसीकडे राहणार नाही.

वानखेडेमधील क्लब हाऊस, हॉल, हॉटेल ,इतर खोल्या यांचा वापर महापालिकेला रुग्णखाटा ठेवण्यासाठी होईल. तसेच, याबाबत एमसीएकडून सहकार्य न मिळाल्यास त्यांच्यावर कारवाई देखील होऊ शकते असे या पत्रात म्हटले आहे.



 राज्यात काल कोरोनाच्या तब्बल 1576 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 29,100 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. दरम्यान, काल राज्यात 49 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी 34 जण मुंबई, तर पुण्यातील 6, अकोला शहरात 2, कल्याण, डोंबिवलीमध्ये प्रत्येकी 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1060 जणांचा मृत्यू झाला आहे.  मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कालपर्यंत 17,761 कोरोनाबाधित झाले आहेत तर  655 जणांचा मृत्यू झाला आहे.