वसई विरार : पावसाच्या कहराने नालासोपारातील आचोले रोड येथील गणेशमुर्ती बनविणारे कारखानदार हवालदिल झाले आहेत. गणेशमुर्ती बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये पाणी शिरल्याने या कारखानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील 24 जुलै रोजी पावसाच्या कहराने गणपतीच्या कारखाण्यात पाणी शिरुन झालेल्या नुकसानीतून सावरत नाही तोवर. रात्रीच्या पावसाचे पाणी शिरल्याने पुन्हा नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.


गणेश उत्सव जवळ आल्याने गणपती बाप्पाच्या मोठ्या मुर्तींना केवळ कलर करणे बाकी आहे. मात्र सततच्या पावसाने यामध्ये अडचणी येत आहेत. त्यात आता दिवसही कमी राहिल्याने गणेशमुर्ती  बनविणारे कारखानदार चिंताग्रस्त झाले आहेत.

वसई विरार क्षेत्रात काल रात्री दहा वाजल्यापासून पावसानं जोरदार मुसंडी मारली. रात्री एक वाजता सखल भागात रस्त्यावर पाणी साचलं होतं. त्यात नालासोपारातील आचोले रोड येथील चंदन नाक्याजवळ असलेल्या गणेशमुर्ती बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये पाणी शिरलं.  या ठिकाणी लागूनच काही कारखाने आहेत. मागील 24 जुलै रोजी जोरदार आलेल्या पावसामुळे येथील मोठ्या मुर्ती देखील पाण्यात भिजल्या होत्या. त्या नुकसानीतून सावरत नाही तोच पुन्हा काल रात्रीही या कारखान्यात पाणी शिरुन नुकसान झालं.

कारखान्यातील कामगारांना रात्रभर पाणी बालटीने काढाव लागलं. यावेळी लहान गणेशमुर्ती उंच जागी ठेवल्या होत्या. मात्र मोठ्या गणेशमुर्ती उंच जागी ठेवता येत नव्हत्या. त्यामुळे मुर्त्यांचा खालील भाग भिजला गेला. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमुर्ती असल्यामुळे एक फुट पाणी आलं असलं तरी ते पीओपी  चार फुटापर्यंत पाणी खेचतं. त्यामुळे या गणेशमुर्ती ओल्या राहात आहेत.  या ओल्या गणेशमुर्तींना रंगकाम केलं जाऊ शकत नसल्यानं कारखानदार संकटात आहेत.

गणेशोत्सव  2 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या गणेशमुर्ती पाच ते सात दिवस आगोदर घेऊन जातात.  त्यामुळे वेळेवर गणेशमुर्ती पूर्ण होतील का असा प्रश्न आता कारखानदारांसमोर पडला आहे.