पालघर : डहाणूमध्ये काल झालेल्या बोट दुर्घटनेत खलाशासह 35 जणांना बाहेर काढण्यात स्थानिक आणि भारतीय तटरक्षक दलाला यश आले. कालपासन सुरु असलेली शोध मोहीम जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरुन बंद करण्यात आली आहे. 35 पैकी तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला.


काल 11.30 वाजता सुरु केलेली ही शोधमोहिम आज सकाळी 11.30 वाजता अशी तब्बल 24 तासानंतर थांबवण्यात आली. जिथे घटना घडली, त्याच्या चारही बाजूने 10 नॉटिकलपर्यंतच्या परिसरात शोधमोहिम राबवण्यात आली. यामध्ये दोन बोटी आणि तीन हैलीकॉप्टर, तसेच स्थानिक मच्छीमार बोटींचा समावेश होता.

घटना काय घडली?

डहाणू बोट दुर्घटनेत पालघर पोलिसांनी बोट मालक धीरज अंभीरे, बोट चालक पार्थ अंभीरे आणि खलाशी महेंद्र अंभीरे यांच्यावर हयगयीचा गुन्हा दाखल केला आहे. खलाशी महेंद्र अंभीरे यांनी आपण विद्यार्थ्यांना बोटीत न बसण्याचा सल्ला दिल्याचं म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना महेंद्र अंभीरे यांनी ही माहिती दिली.

विद्यार्थी बोटीवर सेल्फी घेण्याच्या मोहापायी बोटीच्या एका बाजूला सरकले आणि ही दुर्घटना घडल्याचं डहाणूची राणी बोटीचे खलाशी महेंद्र यांनी सांगितलं. बोट कलांडताना आपण आणि आपला पार्थ अंभीरेने विद्यार्थ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचंही ते म्हणाले.

पालघर जिल्ह्यातील समुद्रात तब्बल 40 जणांचा जीव धोक्यात सापडला. मात्र 32 जणांचं नशिब बलवत्तर होतं. तर 3 विद्यार्थिनींना आपला प्राण गमवावा लागला.

के. एल. पोंडा हायस्कूलची 40 मुलं पिकनिकसाठी समुद्राकाठी आली. तिथे महेश अंबिरे यांची बोट मुलांनी भाड्याने घेतली. समुद्रात 300 मीटरवर फेरी मारताना मुलांनी फोटोसेशनही केलं. मग वेळ आली सेल्फीची.. सेल्फीसाठी मुलं बोटीच्या एका बाजूला आली.. आणि बोटीचा बॅलन्स गेला.. यातच बोट उलटली..