मुंबई : अरबी सुमद्रात तयार झालेल्या वायु चक्रीवादळाने मंगळवारी दुपारी आपली दिशा बदलून गुजरातच्या दिशेने आगेकूच केली आहे. अरबी समुद्रातील ‘वायु’ चक्रीवादळचा परिणाम मुंबईतही दिसून आला आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरही वादळी वेगानं वारे वाहत आहेत. दुपारी 2 वाजता अरबी समुद्रातील वायु चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर वादळ होतं.


वायु चक्रीवादळामुळे मुंबई आणि किनारपट्टीवर 50 ते 55 किमी वेगानं वारे वाहत आहेत. दरम्यान, वायु वादळाचा तडाखा मुंबईला थेट बसणार नसला तरी, त्याचा परिणाम वादळी वाऱ्याच्या रुपाने पाहायला मिळत आहे. या चक्रीवादळाचे उद्या तीव्र चक्रीवादळात रुपांतर होणार आहे.

दुपारी 1 वाजल्यापासून मुंबईत पावसाच्या सरी कोसळत असून वाऱ्याचा वेगही जास्त आहे. त्यामुळे समुद्रकिनारी जाणाऱ्या नागरिकांनी वादळी वाऱ्यांचा आणि लाटांचा अंदाज घेऊन किनारपट्टीपासून सुरक्षित अंतरावरच जाण्याचं आवाहन आपत्ती व्यवस्थापनानं केलं आहे. तसेच झाडांखाली कार पार्क करु नये तसेच उभे राहू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Vayu Cyclone Mumbai | वायू चक्रीवादळ मुंबईसाठी धोक्याचे नाही, मात्र वादळाचा परिणाम जाणवणार | ABP Majha



वायु चक्रीवादळाचे मुंबईवर झालेला परिणाम

चर्चगेटमध्ये होर्डिंग कोसळून 62 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चर्चगेट स्टेशनवर जोरदार वाऱ्यामुळे होर्डिग कोसळला. या होर्डिंगखाली सापडून मधुकर नार्वेकर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

- वांद्रे पश्चिम भागातील एसव्ही रोडवर स्कायवॉकच्या पत्र्याची शेड खाली कोसळून अपघात झाला आहे. यात दोन महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून जखमींवर भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेच. जोरदार वाऱ्यामुळे स्कायवॉकला लावण्यात आलेली पत्र्याची शेड निखळून पादचाऱ्यांवर पडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- बोर्डी रोड रेल्वेस्थानकानजीक पुलाचे काम सुरु असताना जोराच्या वाऱ्यामुळे 5 गर्डर झुकल्याने पश्चिम रेल्वेची रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. या घटनेत घटनास्थळी काम करणारे 4 कर्मचारी किरकोळ जखमी झाले असूव जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेच. गेल्या अर्ध्या तासापासून दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

VIDEO | मुंबईवरचं वायू वादळाचं संकट टळलं, मात्र परिणाम जाणवणार | एबीपी माझा



दरम्यान गोवा आणि महाराष्ट्राला वायु चक्रीवादळाचा धोका टळलाय. मात्र आता गुजरातच्या वेशीपासून काही अंतरावर वादळ आहे. आज (बुधवारी) राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून पुढील पाच दिवसात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे, असा अंदाज पणजी वेधशाळेने वर्तवला आहे.

गोव्यापासून 350 किलोमीटर दूर अरबी समुद्रात तयार झालेल्या वायु चक्रीवादळाने आणखी जोर धरला आहे. परंतु हे वादळ पुर्वेकडे न सरकता उत्तरेच्या दिशेने पुढे सरकू लागल्याने गोव्यावरील वादळाचा धोका टळल्याचे मानले जात आहे.

हे वादळ आता 15 किमी प्रतितास वेगाने गुजरातकडे सरकत आहे. गुरुवारी (13 जून) हे वादळ गुजरातच्या पोरबंदर ते माहुआदरम्यानच्या वसवेळ किनारपट्टीला धडक देईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगतच्या भागात ताशी 70 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या 

वायू चक्रीवादळामुळे नद्यांची पातळी वाढली, किनारी भागाला धोका, मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात


गुजरातमधील किनारपट्टी भागात हाय अलर्ट, येत्या 12 तासात 'वायू' चक्रीवादळ धडकण्याची शक्यता


वायू चक्रीवादळामुळे मान्सूनची प्रगती थांबली, राज्यात मान्सून आणखी लांबणार, शेतकरी चिंतेत