महापालिकेत गोंधळ घातल्यास नगरसेवकपद रद्द होणार ?
एबीपी माझा वेब टीम | 28 Jul 2016 03:19 PM (IST)
मुंबई : महापालिका सभागृहात गोंधळ घातल्यास आता नगरसेवक पद जाऊ शकतं. कारण तसा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास महापालिकेच्या सभागृहात गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांचं पद रद्द करण्याबाबत आयुक्तांना अधिकार मिळणार आहेत. आयुक्त कारवाईबाबतची शिफारस राज्य सरकारला करतील. गेल्या काही दिवसांत महापालिकेत झालेल्या गोंधळानंतर हा प्रस्ताव आणण्यात आला आहे. देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीनंतर महापालिकेच्या महासेभत विरोधकांनी गोंधळ घातला होता. तसंच काही सदस्यांनी महापौरांसमोर कचरा आणून टाकला होता. त्यानंतर महापौरांनी सभागृह शिस्तीत चालावं म्हणून अधिनियमात सुधारणा करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रशासनाने अतिरिक्त आयुक्तांची समिती नियुक्ती केली होती. या समितीनंच हा प्रस्ताव तयार केला आहे.