मुंबई : मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये तब्बल 21 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जसलोक हॉस्पिटल 13 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय हॉस्पिटल प्रशासनाने घेतला आहे. याआधी मुंबईतीलच वोकहार्ट रुग्णालयातील 26 नर्स आणि तीन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याने हे रुग्णालय कन्टेंटन्मेंट झोन घोषित करुन सील करण्यात आलं आहे.


जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाकडून कर्मचाऱ्यांना ही लागण झाल्याचं हॉस्पिटल प्रशासनाने म्हटलं आहे. सुरुवातीला एका नर्सला ही लागण झाली. त्यानंतर सुरक्षिततेचा उपाय म्हणून हॉस्पिटलने त्यांच्या 1005 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली, ज्यात 21 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. या सर्वांवर सध्या जसलोक, कस्तुरबा आणि सेव्हन हिल्समध्ये उपचार सुरु आहेत.


या घटनेनंतर खबरदारी म्हणून जसलोक प्रशासनाने 13 एप्रिलपर्यंत हॉस्पिटल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त इमर्जन्सी आणि कोविड-19 हेच वॉर्ड सुरु राहणार असल्याची माहिती जसलोक हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र हरयान यांनी दिली आहे.


वोकहार्ट रुग्णालयातील कर्मचाऱ्यांरी कोरोना पॉझिटिव्ह
भारतात कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. त्यात मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयात एका आठवड्यातच 26 नर्स तीन डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने मुंबई महापालिकेने हे हॉस्पिटल सील केलं. सगळ्यांच्या कोरोना चाचणी दोन वेळा निगेटिव्ह आल्याशिवाय कोणालाही आत प्रवेश मिळणार नाही किंवा कोणी हॉस्पिटलमधून बाहेर येणार नाही.


दरम्यान, रुग्णांवर उपचार करताना रुग्णालयांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट अर्थात पीपीई अनिवार्य करावं, असं जाणकारांचं मत आहे. कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने वोकहार्ट आणि जसलोक हॉस्पिटल दक्षिण मुंबईतील ही दोन प्रमुख रुग्णालयं आता कन्टेंटन्मेंट झोन घोषित झाली आहे.


राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1018 वर
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1018 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात काल (7 एप्रिल) कोरोनाच्या 150 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 12 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांपैकी 6 जण मुंबईत, 3 पुण्यात तर प्रत्येकी 1 जण नागपूर, सातारा, भाईंदर येथील आहेत. राज्यात आतापर्यंत 64 जणांचा मृत्यू झाला आहे.


याशिवाय देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4789 झाला असून 124 जणांचा मृत्यू झाला आहे.