मुंबई : तुमच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे असतील किंवा अजीबातच लक्षणे नसतील तर कोरोना घरी राहुनही बरा होऊ शकतो. मात्र, त्यासाठी योग्य ती खबरदारी घेणंही तितकंच गरजेचं आहे. अन्यथा कोरोनाबाधितांचं रुग्णालयात न जाता होम क्वारंटाईन होणं जीवावर बेतु शकतं. गेल्या काही दिवसांत लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांचा अचानक झालेला मृत्यू होम क्वारंटाईन उपचार पद्धधतीविषयी साशंकता निर्माण करतोय.


9 जून रोजी बीएमसीचे उपायुक्त शिरिष दीक्षित यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहत्या घरी मृत्यू झाला. शिरीष दिक्षित हे मृत्यूच्या आदल्या दिवसापर्यंत महापालिका मुख्यालयात कर्तव्यावर हजर होते आणि त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली होती. म्हणून त्यांनी घरीच उपचार घेण्याचे ठरवले आणि 24 तासांतच त्यांना मृत्यूनं गाठलं. 15 मे रोजी शाहूनगर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले 32 वर्षीय पोलिस निरिक्षक अमोल कुलकर्णी कोरोनाबाधित होते. होम क्वारंटाईन असताना चेंबूरमधील राहत्या घरीच कोरोना उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता.


दक्षिण मुंबईतील एका डायबिटीक पेशंट 15 मे ला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर घरीच उपचार सुरू होते. मात्र त्यांची ऑक्सिजन लेव्हल खालवल्यानंतर त्याच्या मुलानं दिवसभर अँम्ब्युलन्स आणि हॉस्पिटल बेडसाठी फोन आणि धावाधाव केली मात्र उपलब्ध न झाल्यानं 23 मे रोजी त्यांचा घरीच मृत्यू झाला.


या सर्वांचे मृत्यू अगदी अनपेक्षित आणि धक्कादायक होते. सौम्य लक्षणे किंवा कोणतीच लक्षणे न दाखवणाऱ्या कोरोनानं यांचा अचानक घात केला. महत्वाचं म्हणजे फार गंभीर स्थिती नाही म्हणून यांना घरीच उपचार दिले जात होते. पण, हेच घरचे उपचार महागात पडले. सुरुवातीला जेव्हा कोरोनाबाधितांची संख्या कमी होती. त्यावेळी प्रत्येक कोरोनाग्रस्त रुग्णालयात दाखल व्हायचा.मात्र, नंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली.आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी करण्यासाठी ज्या घरात होम आयसोलेशन शक्य असेल त्या रुग्णांना घरीच थांबून उपचाराचा सल्ला दिला जाऊ लागला.


मुंबईकरांना रुग्णखाटा असूनही घरीच उपचार घेण्यासाठी का सुचवले जाते?


मुंबई महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार मुंबईत सध्या घरीच उपचार सुरू असलेले कोरोना रूग्णांची संख्या 18,797 इतकी आहे. तर, विविध रुग्णालयांत दाखल असलेले रुग्ण 7600 इतके आहेत. सध्या मुंबईत प्रत्यक्ष उपचार सुरू असलेले रुग्ण म्हणजेच अॅक्टिव्ह कोरोना केसेस आहेत 26,379. तसंच, येत्या दहा दिवसांत आणखी ३०० नवे आयसीयू बेडस् महापालिका तयार करत असल्याचं महापालिका आयुक्तांकडून सांगण्यात आलंय.


म्हणजेच जर रुग्ण खाटांची संख्या वाढत असेल तर उपलब्ध असलेल्या खाटा रुग्णांना जलदगतीनं का मिळत नाहीत? यंत्रणेवरचा ताण कमी करण्यासाठी आणि उपलब्ध रिकाम्या रुग्णखाटांचे केवळ आकडे दाखवण्यासाठी कोरोनाबाधितांना घरीच रहा असा सल्ला दिला जातोय का असेही प्रश्न उपस्थित होत आहेत.अर्थात गरजुंना आणि गंभीर प्रकृतीच्या रुग्णांना रुग्णखाटा प्राधान्यानं मिळाव्यात हा ही त्यामागे उद्देश आहेत. मात्र, होम क्वारंटाईनचा पर्याय निवडतांना रुग्णांची वेळोवेळी तपासणी आणि गरज पडल्यास तातडीचे उपचार मिळणंही तितकच गरजेचं आहे.


तज्ज्ञ काय सांगतात?


डॉ. अमित मायदेव सांगतात की, "कोरोना रुग्णांना होम क्वारंटाईन करुन उपचार सुरु करण्यापूर्वी रुग्णाच्या छातीचा एक्स रे काढणे गरजेचे असते. अतिसौम्य लक्षण असल्यास एक्स रे काढला जात नाही. मात्र, कोरोनाची खरी गंभीरता एक्स रे मार्फतच कळू शकते. तसंच, होम क्वारंटाईन केलेल्या रुग्णांनी रोज स्वत: स्ववत:ची ऑक्सिन पातळी मोजली पाहिजे व त्यातील बदलांची नोंद ठेवली पाहिजे. यासाठी ऑक्सिमिटर चा वापर करायला हवा, ऑक्सिजन पातळी 93 च्या खाली जाणे धोकादायक ठरु शकते"


त्यामुळे, घरीच राहून कोरोनाला हरवा हे वाक्य आपण कोरोनापासून प्रतिबंध व्हावा म्हणून वापरता येऊ शकतं. मात्र, कोरोना झाला तरी घरीच रहा हे मात्र जिवावर बेतु शकतं.


संबंधित बातम्या :